किरीट सोमय्या रत्नागिरीच्या दौर्यावर असताना उपोषणासाठी बसलेल्या एसटी कामगारांची भेट घेतली. मागील सोळा दिवस एसटीचे कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी अभूतपूर्व शांततेने आंदोलन करीत आहेत. लाखो कर्मचारी रस्त्यावर बसले आहेत, शासनाने त्यांच्याशी बोलणी करून त्यांच्यावरील अन्याय दूर करावा अशी मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रत्नागिरीमध्ये केली आहे.
किरीट सोमय्या यांनी उपोषणासाठी बसलेल्या एसटी कामगारांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. परिवहनमंत्री अनिल परब व राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी चार तास बोलणी केली कि काय करत होते? ही नाटकं बंद करा आणि या एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्या असे म्हणत सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार केले.
ते म्हणाले कि, हे सरकार म्हणजे घोटाळेबाज माफिया सरकार आहे. कोरोना काळापासून चाळीस लोकांचा मृत्यू झाला तरी, मग अनिल परब करतात तरी काय! असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे अजून अशा गोष्टी घडू नये म्हणून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करा असे सोमय्या यांनी म्हटले आहे.
त्याचप्रमाणे रत्नागिरी पालकमंत्र्यांच्या मुरुड समुद्रकिनारी असलेल्या बेकायदेशीर रिसोर्ट बद्दल त्यांना विचारणा केली असता, ते बेकायदेशीरच असून तसा अहवाल तयार झाल्याची माहिती जिल्हाधिकार्यांनी दिली आहे. महाराष्ट्र कोस्टल झोन अॅथॉरिटीने सुद्धा हे रिसॉर्ट बेकायदेशीर बांधलेले असल्याचे मान्य केले आहे. आता ठाकरे सरकार हा रिसॉर्ट केव्हा पाडणार असा प्रश्न माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री व पर्यावरण मंत्र्यांना रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे, त्याचप्रमाणे अॅड. परब यांच्यावर शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी त्यावेळी केली.