माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कारखान्या प्रकरणी हसन मुश्रीफ यांनी १०० कोटींचा घोटाळा केला आहे, असा गंभीर आरोप केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूरमध्ये जाण्यासाठी रोखण्यासाठी, त्यांच्या घरासमोर फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आरोप केल्यानंतर कोल्हापुरात जाण्यापासून अडवले. पोलिसांनी विनंती केल्यानंतर किरीट सोमय्या कराडमध्ये उतरले. त्यामुळे कराड मध्ये किरीट सोमय्या यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली.
तेंव्हा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले कि, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील ईडी कारवाईच्या भीतीनं माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील सर्व पुरावे माझ्याकडे असून ते सर्व मी ईडीकडे देणार आहे, असं सोमय्या यांनी म्हटल आहे. उदया यासंबंधीचे सर्व पुरावे उद्या ईडी आणि इनकम टॅक्स विभागाकडे सुपूर्द करणार असून या घोटाळ्याची कसून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
घोटाळे उघडकीस आणणाऱ्याला अटक करणारं सरकार म्हणजे हे ठाकरे सरकार आहे. मला मुंबईबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठीचे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश पोलिसांनी मला दाखवले, असंही सोमय्या म्हणाले. सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांनी मला धक्काबुक्की केली. माझ्यावर हल्ला व्हावा हीच सरकारची इच्छा आहे का? असा थेट सवालही त्यांनी केला. पोलिसांनी मला कोणत्या आदेशाअंतर्गत गणेश विसर्जनापासून रोखलं! काल मला सहा तास कोंडून ठेवण्यात आले होते. मी हात जोडून विनंती केली की ऑर्डर दाखवा. मी पुराव्यासह कागल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार होतो, पण तिथेही मला अडवलं गेलं, असंही त्यांनी सांगितले.
सत्तेसाठी सरकारने हिरवा रंग धारण केला असेल, पण उद्धव ठाकरे सरकारचा उद्धटपणा आम्ही खपवून घेणार नाही, असं ते म्हणाले. पोलिसांच्या विरोधात आम्ही हायकोर्टात जाणार असल्याचंही त्यांनी सांगितले. आणि मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही मी लवकरत लवकर उघडकीस आणणार असल्याचं सोमय्यानी स्पष्ट केले आहे.