पुढील महिन्यामध्ये येऊ ठेपलेल्या, गणपती उत्सवासाठी अनेक चाकरमानी २ महिने आधीपासूनच गावाला जाण्याची तयारी करून आहेत. मागील वर्षीचा गणपती कोरोनाच्या संकटामध्ये गेला, म्हणून तिकीटापासून सर्व तयारी, आधीपासूनच करण्यात आली आहे. गणपती उत्सवाच्या निमित्ताने कोकणामध्ये येणार्या चाकरमान्याचे प्रमाण वाढणार असल्याने, कोरोना वाढण्याची शक्यता सुद्धा जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे रत्नागिरीचे पालकमंत्री अँड. अनिल परब यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोरोना लसीकरणाचा कोटा वाढवून देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याची माहिती दिली.
जिल्ह्यामध्ये कोविड स्थिती आढावा बैठक पार पडली. यावेळी परब यांनी जिल्हयातील कोरोना स्थितीची माहिती घेतली. तसेच मोठ्या प्रमाणावर तपासण्या होवूनही रूग्णसंख्या कमी होत नाही. याबाबत प्रशासनाने अधिक लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले. चिपळुणमधील खासगी कोविड रूग्णालयांचे आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संभाव्य तिसर्या लाटेची सुद्धा शक्यता असल्याने यंत्रणा पुन्हा कार्यान्वित होऊन जागरूक राहणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ते ताब्यात घेवून पुन्हा कार्यान्वित करण्याचे निर्देश द्यावेत, अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बैठकीमध्ये केली आहे.
कोरोना संक्रमणाच्या भीतीने मुंबईमधील मुख्य स्थानकांमध्ये टेस्ट करण्यासाठी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे एकतर ७२ तास आधीचा कोरोनाचा रिपोर्ट प्रवासादरम्यान स्वत: सोबत बाळगणे सक्तीचे केले आहे. किंवा मग स्थानकामध्ये असलेल्या यंत्रणेकडून तपासणी करूनच पुढील ठिकाणी जावे लागेल. त्यामुळे गणपतीच्या दरम्यान अनेक चाकरमानी गावाकडे येणार असल्याने, लसींचा साठा सुद्धा आवश्यक तेवढा वेळेला उपलब्ध असणे गरजेचे आहे.