कोकण रेल्वेच्या अनेक स्थानकांवर अनेक लहान मोठे स्टोल्स, कॅन्टीन आपण पाहतो. अनेक रेल्वेमध्ये विक्रीसाठी येणारी लोक हि परप्रांतीय असतात. ना धड त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांचे ज्ञान असते. परंतु आपला व्यवसाय करण्यासाठी रेल्वे मध्ये काही न काही पदार्थ, वस्तू विकण्यासाठी ते विविध प्रकारची काम करताना दिसतात.
त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी, चिपळूण-मडगांव -रोहा येथे पूर्वीचे कॅन्टीन आहे व ९ वर्षाने कॅन्टीन व स्टॉलचे टेंडर निघाले आहेत. कोकणातील जेवढे रेल्वेस्टेशन आहेत त्या रेल्वे स्टेशनचे कॉन्ट्रॅक्ट परप्रांतीयांना देण्याचे वरिष्ठ अधिकार्यांनी कट रचला आहे. कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाला स्थानिकांना वगळून परप्रांतीयांना जर ठेका दिला तर याद राखा असा इशारा दिला आहे.
अनेक स्थानिकांनी यासाठी अर्ज केलेले असून देखील त्यांना डावलून कायम इतरांनाच ठेके दिले जात आहेत. जर महाराष्ट्रातील स्थानिकांनी अर्ज केले गेले असून त्यांचे अर्ज मान्य न करता, कर्नाटक उडपी येथील व्यक्तींना रत्नागिरी रेल्वे स्टेशनचे टेंडर कसे काय देण्यात येते? असा रोखठोक सवाल करण्यात आला आहे.
त्यामुळे कोकण रेल्वेची भरती निघाली तरी सुद्धा कायम स्थानिकांच्या पदरी निराशाच आली आहे. परप्रांतीयांना भरतीमध्ये जास्त घेतले जाते, आणि स्थानिक तरुणांच्या तोंडाला कायम पाने पुसली जातात. त्यामुळे यावेळेला कॅन्टीन व स्टॉलचे टेंडर निघाले असता, स्थानिक पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत. स्थानिक लोकांचे अर्ज असतानाही त्यांना कसे डावलले जाते, जर असे कराल तर याद राखा. आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा दिला आहे.