तालुक्यातील कोळीसरे-कोठारवाडी येथे सहा महिन्यापूर्वी लग्न झालेल्या नव दाम्पत्याने नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी नैराश्येतून ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
संदीप जयवंत गोताड वय २७ व पूजा संदीप गोताड दोघेही रा. कोठारवाडी-कोळीसरे असे आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे. ही घटना रविवारी ता. ३० सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. पूजा गोताड या थोड्या मतिमंद होत्या, आणि त्या वारंवार आजारीही असायच्या. यामुळे संदीपच्याही वागण्यात देखील बदल घडला असून, तो दारूच्या आहारी गेला होता, असे संदीपच्या वडिलांनी चौकशीत सांगितले. त्यामुळे प्रथमदर्शी या दाम्पत्याने नैराश्येतूनच आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संदीप यांचे वडील जयवंत गोताड हे सकाळी आगरनरळ व निवेंडी येथे कामावर निघून गेल्यावर, संदीप व पूजा दोघेच घरी होते. सायंकाळी जयवंत हे कामावरून घरी आल्यानंतर घरामध्ये दिवे लावलेले नसून अंधार दिसला. त्यांनी घरातील लाईट लावला व जेवणाच्या खोलीमध्ये गेले असता त्यांनी संदीप व त्याची पत्नी पूजा यांनी लाकडी भालाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
याबाबत संदीपचे वडील जयवंत यांनी तत्काळ खंडाळा पोलिस दूरक्षेत्र यांच्याशी संपर्क साधला. संदीप व त्याची पत्नी यांना प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद येथे नेण्यात आले परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
कोळीसरे-कोठारवाडी येथे राहणारे संदीप जयवंत गोताड त्याची पत्नी पूजा गोताड या नवविवाहित दाम्पत्याच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नसून, अधिक तपास जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक क्रांती पाटील व त्यांचे सहकारी करत आहेत.