कोकण रेल्वेमार्गावरील सर्वसामान्यांच्या हक्काच्या गाड्या असलेल्या सावंतवाडी-दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस तसेच रत्नागिरी-दिवा रत्नागिरी पॅसेंजर या दोन्ही गाड्यांचा प्रवास लवकरच ‘ठंडा ठंडा कूल कूल’ असा अनुभवायला मिळू शकतो. कोकण रेल्वेने या दोन्ही गाड्यांना प्रत्येकी एक एसी चेअरकारचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. कोकण रेल्वेमार्गावरील सावंतवाडी- दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस दिवा – रत्नागिरी पॅसेंजर या गाड्यांना एसी चेअरकारचा प्रत्येकी एक डबा जोडला जावा यासाठी कोकण विकास समितीने रेल्वेकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. यासाठी कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत शंकर दरेकर यांनी कोकण रेल्वेला पत्रही दिले आहे.
विशेष म्हणजे १४ ऑगस्टला कोकण विकास समितीकडून देण्यात आलेल्या पत्राला कोकण रेल्वेने अवघ्या दहा दिवसांत सकारात्मक प्रतिसादही दिला आहे. या संदर्भात कोकण रेल्वेने कोकण विकास समितीला पाठवलेल्या पत्रात दिवा-रत्नागिरी तसेच दिवा-सावंतवाडी या दोन्ही गाड्यांना आता वातानुकूलित चेअरकार कोच जोडण्यासंदर्भात पर्याय तपासला जात असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येत्या गणेशोत्सवापासून या दोन्ही गाड्यांमधून कोकणवासीयांना गारेगार डब्यातून प्रवास करण्याचा अनुभव घेता येऊ शकतो, अशी शक्यता निर्माण झाली आहे.