महाराष्ट्रातील एकमेव प्रकल्प ठरलेल्या पोफळी ता. चिपळूण येथील प्रकल्पातून १६ मे १९६२ पासून वीजनिर्मिती सुरू झाली. पाण्यावर निर्माण होणारी सर्वात स्वस्त वीज म्हणून या प्रकल्पाची देशभरात ख्याती आहे. या प्रकल्पाचे चार टप्पे आहेत. जास्त मागणीच्या वेळी चारही टप्प्यातून एकूण २ हजार ९५८ मेगावॅट वीजनिर्मिती केली जाऊ शकते. प्रकल्पात २०२१-२२ मध्ये रेकॉर्ड ब्रेक ३ हजार ८६८ मेगावॅट वीजनिर्मिती झाली आहे.
कोयना प्रकल्पाची उभारणी सह्याद्रीतील डोंगरांच्या खाली करण्यात आली आहे. कोयना धरण आणि पोफळीचे वीजनिर्मिती केंद्र सुरक्षेच्या कारणास्तव लादण्यात आलेल्या निर्बंधामुळे कायमच चर्चेत आहे. पूर्वी पर्यटकांना कोयनेचा प्रकल्प पाहण्यासाठी प्रवेश दिला जात होता; मात्र काही वर्षांपूर्वी मुंबई येथे एका अतिरेक्याकडे कोयना धरणाचा नकाशा सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर मात्र कोयनेतील बोटिंग सुविधा बंद करण्यात आली.
कोयना प्रकल्पाची सुरक्षा आतापर्यंत महानिर्मिती कंपनीने स्वतःच्या यंत्रणेद्वारे अबाधित ठेवली आहे; मात्र आता कोयना प्रकल्पाची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे म्हणजेच सीआयएसएफ कडे सोपवण्याची सुरूवात झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या सुरक्षेचा खर्च १५ कोटीवरून सुमारे ८५ कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हा खर्च सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून वीज बिलामार्फत वसूल केला जाणार आहे.
देशामध्ये देखील अतिरेकी कारवाया अधिक प्रमाणात वाढल्यामुळे कोयना प्रकल्प पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर २४ तास महानिर्मिती कंपनीची कडेकोट सुरक्षा बंदिबस्त असतो. त्यासाठी कंपनी दरवर्षी १५ कोटी रुपये खर्च करत होती; मात्र गेल्या काही काळापासून प्रकल्पाची सुरक्षा वेगवेगळ्या यंत्रणांकडे सोपवण्यात येत आहे. सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच, या ठिकाणी सीआयएसएफचे जवान तैनात करण्यात आलेले दिसून येणार आहेत. प्रकल्पाच्या सुरक्षेच्यादृष्टीने सीआयएसएफने सुचवलेल्या सुरक्षाविषयक सर्व बाबींची पूर्तता करण्यात येत आहे.