कोयना धरणातून पोफळीतील वीजनिर्मिती केंद्राकडे पाणी वाहून नेणाऱ्या बोगद्यातील गळती काढण्याचे काम महिन्याभरात सुरू होणार आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यातील पाऊस कमी झाल्यानंतर या कामाला सुरवात होणार आहे. या वृत्ताला कोयना जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. कोयना धरणातून पोफळीतील वीजनिर्मिती केंद्राकडे पाणी वाहून नेणाऱ्या बोगद्याला गळती लागली आहे. गेली पाच वर्षे ही गळती सुरू आहे. त्यामुळे दिवसा हजारो लिटर पाणी वाया जाते. कोयना प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यासाठी नवजा टॉवरमधून जे अधिजल भूयार निघते त्या बोगद्याच्या शेवटी एक सर्जवेल बांधलेली आहे.
या विहिरीपासून पुढे दाबाने बोगद्यातून पाणी वीजगृहाकडे जाते. ही सर्जवेल १९६० ला बांधून पूर्ण झाली आहे. डोंगरातील कातळ फोडून ही विहीर बांधलेली असून, ती कातळात १०० मीटर खोल खोदलेली आहे. त्याला अर्ध्या मीटर रूंदीचे काँक्रिट अस्तरीकरण केलेले आहे. साठ वर्षे या भिंतीने भूकंपाचे अनेक धक्के पचवलेले आहेत. आता काही ठिकाणी अस्तरीकरणाला तडे गेल्यामुळे सर्जवेलमधून हे झिरपलेले पाणी इमर्जन्सी व्हॉल्व्हटनेल किंवा आपत्कालीन झडपद्वारे भुयारामध्ये जाते आणि तिथून ते वाहत डोंगराच्या उतारावरून बाहेर पडते. या पाण्यामुळे वीजगृहाला, जलाशयाला किंवा डोंगराला कोणताही धोका नाही. ही गळती काढण्यासाठी सुमारे २२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
मात्र, सर्जवेलची जागा अत्यंत दुर्गम ठिकाणी असल्यामुळे तिथे मशिनरी नेऊन दुरुस्ती करणे सोपे नाही. दुरुस्तीसाठी वीजनिर्मिती बंद ठेवावी लागेल आणि दुरुस्ती केवळ उन्हाळ्यातच शक्य आहे. या सर्व कारणांमुळे गेली चार-पाच वर्षे दुरुस्तीचे काम रेंगाळलेले आहे. मध्यंतरी गळती काढण्याच्या कामाला गती प्राप्त झाली होती. मागील उन्हाळ्यात गळती काढण्याचे काम केले जाईल, असेही शासनाकडून जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात गळती काढण्याचे काम हाती घेतलेले नाही. कोयना येथे नव्याने रूजू झालेले कार्यकारी अभियंता विश्वनाथ सानप यांनी या कामाला गती दिली. आहे. त्यामुळे महिन्याभरात पाऊस कमी झाल्यानंतर कामाला सुरवात होण्याची शक्यता आहे.