रत्नागिरी शहरातील क्रांतीनगर रिक्षा स्टँडजवळ जुन्या वादातून एका तरुणावर तलवारीने सपासप वर करून प्राणघातक हल्ला केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. धारदार तलवारीने या तरुणावर सपासप तीन वार करण्यात आले. या हल्ल्यात तरुण राजेंद्र विटकर हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या हातावर आणि पायावर गंभीर वार करण्यात आले आहेत. हल्ला झाल्याच्या ठिकाणी सर्वत्र रक्ताचा सडा पडला असून या हल्ल्यातून संबंधित तरुण थोडक्यात बचावला आहे.
कोकण नगर येथील कोपऱ्यावर असलेल्या दारूच्या दुकानात आधी त्याची बाचाबाची झाली होती पण वार का केले गेले? याबाबत मात्र अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. दरम्यान रत्नागिरी पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून अधिकच तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या गंभीर हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. दरम्यान, या हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या तरुणाला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे.
एका तरुणावर दोघांनी मोटरसायकल वरून येऊन भर गजबजलेल्या क्रांती नगर परिसरामध्ये उजवा हातावर आणि पायावर वार केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे. वार करून लाल शर्ट व पांढऱ्या शर्ट वाले मोटरसायकल वरून सुसाट निघून गेले आहेत. रत्नागिरी सारख्या शांत परिसरामध्ये अशा प्रकारे वार केल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मारणाऱ्या मधील एक जण हा एम.आय.डी.सी परिसरातील असल्याचे समजले असून दुसरा हा त्याचा मित्र असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस त्यांचा कसोसीने शोध घेत आहेत.