कुंभार्ली घाटातील अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील पाच वर्षांत दहा कोटींहून अधिक निधी खर्च केला. तरीही अपघात कमी झालेले नाहीत. अवघड वळणे, तीव्र उतार असलेल्या कुंभार्ली घाटांमधील सुरक्षेच्या उपाय योजना तकलादू ठरत आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. घाटातील धोकादायक वळणांवर संरक्षक कठडे उभे करण्याची गरज असतानाही त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुंभार्ली घाट अतिशय धोकादायक बनलेला आहे. या घाटात वाहने दरीत कोसळण्याचा धोका सर्वाधिक आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात येथे दोन वाहने दरीत कोसळून दोघांचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला होता. किरकोळ अपघात हे नेहमीचे झालेले आहेत. चिपळूणमधून जाताना तीव्र चढ आणि कराडहून येताना हा घाट तीव्र उताराचा आहे. घाटातून कराडकडे जाताना अपघाताचा फारसा धोका संभवत नाही. मात्र, कराडहून येताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यास वाहन थेट दरीत कोसळण्याचा धोका संभवतो.
घाट उतरताना वाहनांचे गंभीर अपघात झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. घाटातील संरक्षक कठडे अनेक ठिकाणी तुटलेले आहेत तसेच काही ठिकाणी कठडेच नाहीत. त्यामुळे भरधाव वाहने दरीत कोसळतात. घाटातील सुरक्षेच्या तोकड्या उपाययोजना अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. स्थानिकांना घाटातील वळणे, उतार आणि खोल दरीचा अंदाज असतो. परंतु, दूरवरून येणाऱ्या चालकांना अंदाज नसल्याने त्यांच्या वाहनांचे भीषण अपघात होतात. या बाबी लक्षात घेऊन बांधकाम विभागाने वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपायोजना करणे गरजेचे आहे. घाटात काही ठिकाणी कठडेच नाहीत तर काही ठिकाणच्या कठड्यांची उंची कमी आहे तीव्र उतार आणि वळणाच्या ठिकाणी कठडे नसल्याने धोका वाढले आहेत.
स्थानिकांचे सहकार्य – कुंभाली घाटात अपघात झाल्याचे समजल्यानंतर स्थानिक लोक मदतीसाठी धावतात. रात्री-अपरात्री किंवा पहाटेच्या सुमारासही ते सतर्क असतात. ते अपघातातील जखमींना खोल दरीतून बाहेर काढण्यात मदत करतात तर कधीकधी दरीत पडलेले त्यांचे मौल्यवान सामानही शोधण्यास सहकार्य करतात. त्यांच्यामुळे प्रशासनाला स्थानिकांची मोठी मदत होते. त्यांच्या तत्परतेमुळे जखमींचा जीव वाचवण्यात यशही येते.
वृक्ष लागवडीचाही फायदा – कुंभार्ली घाटात डोंगराच्या बाजूने झाडे आहेत; मात्र दरीच्या बाजूने झाडांचे प्रमाण कमी आहे. तेथे संरक्षण भिंती बांधून त्या टिकणार नाहीत. त्याऐवजी दरीच्या दिशेने उंच जाणाऱ्या झाडांची लागवड केली पाहिजे जेणेकरून अपघात झाल्यावर वाहने त्या झाडांमध्ये अडकतील आणि संभाव्य नुकसान टळेल. उन्हाळ्यात त्या झाडांच्या सावलीखाली पर्यटकही थांबतील. बांधकाम विभागाने वृक्ष लागवडीची मोहीमही हाती घ्यावी.