‘काय करायचे ते करा पणं कुंभार्लीीं घाट हा सुस्थितीत राहिलाच पाहिजे. पडलेले खड्डे आणि कोसळलेल्या भिंती अपघातास कारणीभूत ठरू शकतात. आम्ही बॅरल लावल्यानंतर तुम्ही उपाय योजना केल्यात, मग एवढे दिवस त्याकडे का दुर्लक्ष केले? याचे उत्तर आज देता येत नसले तरी येत्या ८ दिवसात तुम्हाला द्यावेच लागेल’ असा इशारा मनसेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला. सोमवारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयावर मनसेने धडक मारली. मात्र अधिकारी बैठकीला मुंबईमध्ये असल्याने मनसैनिकांनी पुन्हा धडक मारण्याचा इशारा दिला आहे. कुंभार्ली घाटातील रस्तावर खड्डे पडले आहेत.
काही ठिकाणी रस्ताच तुटला आहे. या घाटावर करोडो रुपयांचा निधी दरवर्षी खर्च होत आहे. अशावेळी या घाटाच्या समस्या मात्र काही संपल्या संपत नाहीत. यामुळेच मनसेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी आक्रमक भूमिका घेत सोमवारी मनसैनिकासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभाग कार्यालयावर धडक मारली. राजू खेतले यांच्या नेतृत्वाखाली तालुका संघटक मिलिंद कदम, रिक्षा संघटक राजेंद्र उंडरे, विभाग अध्यक्ष सुरेश घाग, उपविभाग अध्यक्ष विकास महादम, प्रशांत हटकर, शाखा अध्यक्ष आबा हटकर, निरंजय निर्मळ, संजय वाजे, भाई सुर्वे, मंगेश महाडिक, प्रकाश राक्षे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि मनसैनिक उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता हे आजारी असल्याने सुट्टीवर आहेत तर कार्यकारी अभियंता हे मुंबई येथे बैठकीसाठी असल्याने उपस्थित शाखा अभियंता यांच्याजवळ चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी अधिकारीच नसतील तर मला उत्तरे कोण देणार? असा सवाल केला मात्र जी माहिती असेल ती देण्याचा प्रयत्न आम्ही करू असे शाखा अभियंता यांनी स्पष्ट केले.