सध्या अनेक मार्गांवर एकतर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे, खड्डे, खचलेले रस्ते यामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. तर काही ठिकाणी वाहनांच्या झालेल्या खराबीमुळे देखील वाहनांचे अपघात घडत आहेत. काल लांजा येथून सुटलेल्या एसटी बसला पावस येथील उतारात ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास झाला. चालकाला ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आल्यावर, त्याने वेळीच प्रसंगावधान राखून गाडी एका झाडाला टेकवल्याने पुढील दुर्घटना टळली, नाहीतर काहीतरी गंभीर घडण्याची शक्यता निर्माण झाली असती.
रस्त्याच्या कडेलाच लागून दोन घरे असून, सुदैवाने गाडी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका झाडावर अडकून राहिल्याने मोठी घटना घडली. लांजा रत्नागिरी एमएच ४०, एन ९८४१ ही गाडी लांजा आगारातून सात विद्यार्थ्यांसह ९ प्रवाशांना घेऊन सकाळी १०.३० वाजता सुटली. धोपटवाडी येथील शाळेची सात मुले दुपारच्या सत्रासाठी पावस शाळेत येत होती. ही गाडी देवधे मार्गे पावस येथे येत असताना पावस येथील उतारात हा अपघात झाला. एसटी बसच्या समोर दोन रिक्षा आणि एक डंपर जात होता. या वाहनांना वाचविण्यासाठी बस चालकाने ब्रेक मारला. मात्र, त्याचक्षणी निकामी झाल्याचे लक्षात आले.
चालकाने प्रसंगावधान राखून गाडी रस्त्याच्या कडेला एका बांधाच्या सहाय्याने थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचवेळी नेमकी गाडी कलंडली आणि रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका झाडावर अडकली. या रस्त्याच्या कडेलाच दोन घरे होती, परंतु या घरांवर ही गाडी कोसळता कोसळता वाचली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

