रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड येथे आलेल्या महाप्रलयामुळे, परिस्थिती एकदम भयावह झाली होती. अनेक बातम्यामध्ये, चिपळूण खेड मध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेलं संकट दाखवण्यात येत होते. पुरामुळे इमारतीच्या खालचा मजला भरेपर्यंत पाण्याची पातळी झाली होती. अनेक घरे, गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या.
त्यानंतर सुद्धा भयंकर परिस्थितीला चिपळूणवासीयांना सामोरे जावे लागले. पुराच्या पाण्याने वाहत आलेला गाळ, चिखल, कचरा त्यामुळे अनेक धोके समोर ठाकले होते. अनेक ठिकाणाहून गरजेच्या वस्तू घेऊन माणसे मदतकार्य पोहोचवत होती. अशा नैसर्गिक आपत्तीचा अनुभव घेतलेल्यानाच हे दुःख कळू शकते असे म्हणतात.
लातूरमध्ये काही वर्षांपूर्वी भूकंप, दुष्काळ अशा गोष्टी घडल्या आहेत, त्यामुळे अनुभवावरून सद्य परिस्थितीमध्ये लातूरकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पूरग्रस्त चिपळूणवासीयांसाठी मदत आणि प्रेमाची भेट म्हणून दोन ट्रक भरून जीवनावश्यक वस्तू पाठवल्या आहेत. लातूरमध्ये शासनाने फक्त पुरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले असता, दोन ट्रक भरतील एवढी मदत जमा झाली. अनेक अडचणींवर मात करत लातूर पासून चिपळूणपर्यंत ४०० किमी अंतर पार करून, मदत अखेर चिपळूणमध्ये पोहोचली.
लातूर हे महाराष्ट्रातील अशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती अनुभवलेले पूरग्रस्तांना मदत पाठवणारे पहिले जिल्हाधिकारी कार्यालय ठरले आहे.त्याचप्रमाणे, चिपळूण येथे काही कालावधीपूर्वी तहसीलदार पदी कार्यरत असलेले जीवन देसाई यांची लातूर येथे बदली झाली, पण तिथे गेल्यानंतरही चिपळूणचे ऋणानुबंध लक्षात ठेवून त्यांनी आपल्या चिपळूणच्या लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी तसेच येथील तत्कालीन तहसीलदार जीवन देसाई यांचे चिपळूणमधील नोकरीच्या कारकिर्दीमध्ये चिपळूणवासीयांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवले होते, यामुळे येथील जनतेमध्ये देखील त्यांच्याविषयी आत्मियतेची भावना आहे. अशा मोठ्या प्रमाणात पाठविलेल्या मदतीमुळे हे नक्कीच सिद्ध होते की, अजूनही त्यांची चिपळूणशी नाळ जुळलेली असून, चांगले संबंध आबाधित आहेत.