27.9 C
Ratnagiri
Saturday, June 7, 2025

गुकेश – कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस – नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा

बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागात अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची...

रत्नागिरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला पकडले…

पांढरा समुद्र परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला...

उध्दव ठाकरेंचे मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत…

गेल्या दीड महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे...
HomeChiplunजिल्ह्यातील ठाकरे शिवसेनेचे नेतृत्व आ. भास्करशेठ जाधव यांच्याकडे देण्याची शिवसैनिकांची मागणी

जिल्ह्यातील ठाकरे शिवसेनेचे नेतृत्व आ. भास्करशेठ जाधव यांच्याकडे देण्याची शिवसैनिकांची मागणी

अन्यथा पुढील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कठीण होतील.

राजन साळवींसारखा कडवट शिवसैनिक पडतोच कसा? कोण त्याला जबाबदार आहे हे शोधून काढा. प्रशांत यादव यांना संगमेश्वरात दगाफटका का झाला? त्याची कारणे समोर आली पाहिजेत. नेत्यांनीच स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाची वाट लावली. पक्ष रसातळाला नेला. आता भाषणे नकोत, कारणे समोर आली पाहिजेत अशा शब्दात शिवसैनिकांनी भर बैठकीत आपला संताप व्यक्त करत मनातील खदखद उघड केली. आम. भास्कर जाधव यांच्याकडे आता नेतृत्व द्या अशी मागणी देखील यावेळी शिवसैनिकांनी केली. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची पहिलीच बैठक चिपळुणात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते आम. भास्कर जाधव, जिल्हाप्रमुख संजय कदम, सहसंपर्क प्रमुख सचिन कदम, माजी जि.प. अध्यक्ष रोहन बने, तालुकाप्रमुख विनोद झगडे उपस्थित होते. तर पक्षाचे सर्व पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव व आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती.

भाषणे नकोत, कारणे हवीत – बैठक सुरू होताच काही पदाधिकाऱ्यांची भाषणे सुरू झाली. येथेच शिवसैनिकांचा पारा चढला. आता भाषणे नकोत. जिल्ह्यात अत्यंत नामुष्कीजनक पराभव झाला आहे त्याची कारणे समोर आली पाहिजेत. आम्हाला आमचे म्हणणे मांडायचे आहे. आम्हाला बोलण्याची संधी द्या अशी थेट मागणी शिवसैनिकांनी केली तेव्हा माजी खासदार विनायक राऊत यांनी ज्याला कोणाला बोलायचे आहे त्यांनी आपले मत स्पष्टपणे मांडावे असे नमूद करत शिवसैनिकांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

साळवींचा पराभव जिव्हारी – राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांचा झालेला पराभव शिवसैनिकांच्या जिव्हारी लागल्याचे यावेळी दिसून आले. राजन साळवींनी जिल्ह्यात पक्ष उभा करण्यासाठी जीवाचे रान केले. अशा कडवट शिवसैनिकाचा पराभव होतो आणि तो ही मोठ्या फरकाने ? हे शक्य आहे का? काहीतरी गडबड झाली आहे. त्यांच्या पराभवाला जबाबदार कोण आहे? ते समोर आले पाहिजे. विरोधकांना आपल्याच लोकांनी मदत केली अशी चर्चा आहे. ते कोण लोक आहेत? त्यांची नावे समोर आली पाहिजेत अशा शब्दात शिवसैनिकांनी. थेट संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली.

यादवांना दगाफटका का? – चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात प्रशांत यादव यांनी जबरदस्त असे वातावरण निर्माण केले होते. शिवसैनिक त्यांच्यासाठी अहोरात्र प्रामाणिक काम करत होते. प्रशांत यादव यांनी देखील काहीच कमी पडू दिले नव्हते. पण संगमेश्वरमधून त्यांना दगाफटका झाला. संगम `श्वर हा शिवसेनेचा गड मानला जातो. मग संगमेश्वरात असे का घडले? कोण आहे त्यामागे ते शोधून काढले पाहिजे. अन्यथा पुढील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कठीण होतील. कार्यकर्त्यांनी कोणाच्या जीवावर निवडणुका लढवायच्या? अशा प्रश्नांची सरबत्ती शिवसैनिकांनी सुरू केली.

जाधवांना डावलले जातेय – आमदार भास्कर जाधव यांना का डावलले जात आहे का? त्यांच्याकडे कोकणाची जबाबदारी का दिली जात नाही? आक्रमक असे ते एकमेव नेतृत्व कोकणात आहे. परंतु त्यांना ताकद दिली जात नाही. अनंत गीते यांना गुहागरमधून २७ हजाराचे मताधिक्य आम. जाधवांनी दिले. परंतु जाधवांच्या निवडणुकीत अनंत गीते कुठे होते? भास्कर जाधवांसारख्या नेत्याला विजयासाठी झगडावे लागते याचा अर्थ काय घ्यायचा असा सवाल ही यावेळी उपस्थित करण्यात आला. भास्कर जाधवांकडे आता नेतृत्व द्या अशी मागणी देखील यावेळी शिवसैनिकांनी केली.

संजयरावांची खदखद – सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हाप्रमुख संजय कदम यांनी देखील थेट नेत्यांवर निशाणा साधला. शिवसैनिकांच्या भावना योग्य आहेत. दापोलीत मी बलाढ्य अशा ताकदीशी संघर्ष करून अनंत गीते यांना साडेआठ हजाराचे मताधिक्य दिले तेच अनंत गीते माझ्या निवडणुकीला फिरकले देखील नाहीत. असे का? नेते जर असे वागत असतील आणि फक्त स्वतः च्या निवडणुकीला येणार असतील तर कार्यकर्त्यांनी काय करायचे असे स्पष्टपणे सांगत संजयराव कदम यांनी देखील आपली खदखद व्यक्त केली.

रोखठोक भास्कर जाधव – आम. भास्कर जाधवांनी आपल्या नेहमीच्या शैलीत रोखठोक सुनावले. कोकणात पक्षाची जी वाताहत झाली त्याला माझ्यासह सर्व नेते जबाबदार आहेत. हे सत्य नाकारता येणार नाही. प्रत्येकजण फक्त स्वतःसाठी पक्षाचा वापर करून घेत आहे. विधानसभा निवडणुकीत किती नेते कोकणात आले? कुठे प्रचार सभा घेतल्या? अनंत गीतेंसाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले, ते अनंत गीते आहेत कुठे? पक्ष टिकवायचा आणि वाढवायचा असेल तर अनेक बदल करावे लागणार आहेत. पक्षाची पुन्हा बांधणी करायची असेल तर काही कठोर निर्णय घेऊन नेतृत्व उभे करावे लागेल अशा रोखठोक शब्दात सुनावले.

भास्कर जाधवांकडे नेतृव – सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतल्यावर शिवसेना नेते विनायक राऊत म्हणाले, आपले सर्वांचे म्हणणे मी ऐकून घेतले आहे. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मी आपले म्हणणे पोहचवणार आहे. झालेल्या पराभवाची कारणे निश्चितपणे शोधली जातील. तसे काम ही पक्ष पातळीवर सुरू आहे. आगामी स्वराज्य संस्था निवडणुकीचे नेतृत्व आम. भास्कर जाधव यांच्याकैडे असेल. त्यांच्याकडेच ही जबाबदारी दिली जाईल असेही विनायक राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. आघाडीचा निर्णय उद्धवजी घेतील. परंतु आपण स्वबळासाठी तयारी ठेवली पाहिजे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

RELATED ARTICLES

Most Popular