रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे बौद्धवाडी येथे सार्वजनिक विहिरीत पडलेल्या एका बिबट्याची मंगळवारी वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी सुटका केली. अवघ्या १५ मिनिटांत बिबट्याला ‘पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले. वैद्यकीय तपासणीनंतर तो सुखरूप असल्याचे आढळताच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. याविषयी अधिक वृत्त असे की, मंगळवारी दिनांक २३ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वा. च्या सुमारास कोतवडे गावचे सरपंच संतोष बारगोडे यांनी पाली येथील वनपाल यांना एक बिबट्या आपल्या गावातील सार्वजनिक विहिरीत पडला असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच तात्काळ वन परिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी यांना कळवण्यात आले. त्यानंतर बचाव पथक, पिंजरा आणि इतर आवश्यक साहित्यासह वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
४० फूट खोल विहिर – ही विहीर ग्रामपंचायतीच्या घर क्रमांक ४२२ च्या मागील बाजूस भर वस्तीमध्ये आहे, ४० फूट खोल असलेल्या या विहिरीला ३ फूट उंचीचा चिरेबंदी कठडा आहे. विहिरीतील पाण्याची पातळी १० ते १२ फूट असून, बिबट्या विहिरीत उतरण्यासाठी असलेल्या पायरीवर बसला होता. बिबट्याला पाहिल्यानंतर बचाव पथकाने तात्काळ सुटकेचे नियोजन केले. पिंजऱ्याला दोऱ्या बांधून तो सुरक्षितपणे विहिरीत सोडण्यात आला. बिबट्याने अवघ्या १५ मिनिटांत बिबट्याने पिंजऱ्यात प्रवेश केला. त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पशुधन विकास अधिकारी डॉ. अभिजीत भगवान कसाळकर यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. तपासणीत बिबट्या पूर्णपणे सुरक्षित असल्याचे निदर्शनास आले. हा नर बिबट्या असून, त्याचे वय अंदाजे ९ ते १० वर्षे आहे.
भक्ष्याचा पाठलाग – स्थानिक परिस्थिती पाहता, भक्ष्याचा पाठलाग करत असताना बिबट्या विहिरीत पडला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही विहीर शेडनेटने झाकलेली असून, त्यामुळे त्याला बाहेर पडता आले नाही.
बचाव मोहिम यशस्वी – ही बचाव मोहीम विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कामगिरीसाठी परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल न्हानू गावडे, वनरक्षक विराज संसारे, शर्वरी कदम, शाहीद तांबोळी, ऋषिकेश जोशी, महेश धोत्रे, तसेच पोलीस अधिकारी मनोज पावसकर, वाडकर, होमगार्ड मनोज मोहिते यांनी परिश्रम घेतले.
गावकऱ्यांचाही सहभाग – या बचावकार्यात कोतवडेचे सरपंच संतोष बारगोडे, उपसरपंच स्वप्नील पड्याळ, पोलीस पाटील पूर्वा पवार, ग्रामपंचायत सदस्य वैष्णवी माने, दिया कांबळे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष रवींद्र कांबळे, तसेच अनंत फणसोपकर, मयुरेश कांबळे, सुनील कांबळे, सुहास मोहिते, साहिल कांबळे आणि इतर ग्रामस्थांनीदेखील सहभाग घेतला.
नैसर्गिक अधिवासात सोडले – सुखरूप असलेल्या या बिबट्याला नंतर त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्य प्राणी अडचणीत सापडल्यास तात्काळ वन विभागाच्या १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी रत्नागिरी यांनी केले आहे.