आमदार राजन साळवी यांनी आमदार नाही तर आता नामदार व्हावे म्हणजेच मंत्री व्हावे, अशी या मतदार संघातील प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा आहे; पण आपल्याला नामदार होण्यापेक्षा येथील विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ही अधिक मजबूत करायची आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा, विधानसभा या सर्वच निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळवून द्यायचे आहे, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आमदार राजन साळवी यांनी लांजा येथे केले. लांजा येथील गणेश मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार साळवी म्हणाले, या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे आपल्याला भरभरून प्रेम मिळाले आहे.
एक सर्वसामान्य शिवसैनिक ते आमदार असा आपला राजकीय प्रवास झाला आहे. मंत्रीपदापेक्षा आपल्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करणे महत्वाचे वाटते. त्यासाठी आगामी सर्वच निवडणुकीत शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भरभरून यश मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. या निमित्ताने तालुक्यातील सर्व जाखडी व नमन मंडळांचा आमदार राजन साळवी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या वेळी उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, लांजा शहरप्रमुख नागेश कुरूप, उपतालुकाप्रमुख दिलीप पळसुलेदेसाई, सुरेश करंबेळे आदी उपस्थित होते.