पावसाळा सुरु झाल्यापासून, वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. अनेकदा अति वृष्टी तर अनेकदा अति उष्णता, थंडी असे मिश्र वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय देखील धोक्यात आले आहेत. सध्या थंडीचा गारठा मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने, दिवसा उष्णतेचे चटके देखील बसू लागले आहेत.
किनारपट्टी वरील दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय झाले आहे. हलक्या थंडीची चाहूल सुरू झाली असताना कोकण किनारपट्टी भागात आगामी दोन दिवस त्यामुळे हलक्या पावसाचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. तापमान खाली येण्याची शक्यता असतानाच अचानक सुरु झालेल्या पावसाने, तयार झालेल्या पिकाचे नुकसान घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकऱ्यांचीही त्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.
ऐन हिवाळ्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने, बागायतदारांची चिंता वाढली आहे. कोकण किनारपट्टी भागात काही महिन्यांनी आंब्याचा हंगाम सुरु होईल. त्यादृष्टीने झाडांची निगा राखणे, इत्यादी अनेक गोष्टी व्यवसायिक करत असतात. दोन दिवसात जोरदार वारे वाहण्याचा अंदाज असून हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान विभागाचा अंदाजानुसार नोव्हेंबर महिन्यात पुन्हा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीत मोहोर चांगला फुलतो, आणि अचानक पावसाच्या माऱ्याने मोहोर खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र, पावसाचा जोर मध्यम ते हलक्या स्वरुपाचा राहणार आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, सातारा, सांगली तसेच अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव तसेच औरंगाबाद, अहमदनगर या जिल्ह्यांत आगामी दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.