26.9 C
Ratnagiri
Thursday, July 3, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriपावसामुळे जिल्ह्यात दीड कोटीचे नुकसान - १३० घरांचा समावेश

पावसामुळे जिल्ह्यात दीड कोटीचे नुकसान – १३० घरांचा समावेश

दरडप्रवण आणि पूरप्रवण क्षेत्र यापैकी एकाही कुटुंबाला स्थलांतराच्या नोटिसा देण्यात आलेल्या नाहीत.

जिल्ह्यात मॉन्सून सक्रिय झाल्यापासून मुसळधार पावसाने विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे. या पावसामध्ये पाण्यात बुडून आणि वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. तर संरक्षक भिंत कोसळून व अन्य घटनांनी पाच जखमी झाले. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, रस्ते खचले, पुलांना बाधा झाली, झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. १३० कच्च्या व पक्क्या घरांचे सुमारे ४४ लाखांचे नुकसान झाले तर सार्वजनिक मालमत्तांचे जवळपास एक कोटीहून अधिक असे सर्व मिळून दीड कोटीचे नुकसान झाले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अहवालामध्ये हे स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने इशारा पातळीवर वाहणाऱ्या नद्यांचे पाणी देखील ओसरले आहे. अनेक ठिकाणी आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. आजपर्यंत सरासरी १०४३.३९ मिमीएवढ्या पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये राजेश चिमाजी जाधव (वय ४५, गोविळ, ता. लांजा) येथे वीज पडून त्यांचा मृत्यू झाला.

राजेंद्र सोनू कोळंबे (वय ४९, वाणंद, ता. दापोली) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर ५ जण जखमी झाले आहेत. रत्नागिरी तालुक्यात काजरघाटी खुर्द बौद्धवाडी येथे घराची संरक्षक भिंत कोसळून तीन झोपड्यांवर पडून आशा राठोड, मोहन राठोड, रोहन जाधव हे जखमी झाले. आबलोली मार्गावर झाड पडून आदेश नाटेकर, साई हरचेरकर यांना दुखापत झाली होती. नागरिकांच्या स्थलांतराबाबतचा रकाना अहवाल कोरा आहे. दरडप्रवण आणि पूरप्रवण क्षेत्र यापैकी जिल्ह्यातील एकाही कुटुंबाला स्थलांतराच्या नोटिसा देण्यात आलेल्या नाहीत. जास्त पाऊस सुरू झाल्यानंतर साधारण जुलैमध्ये अतिवृष्टीत धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यास स्थलांतराच्या नोटिसा देण्यात येतील, असे प्रशासनाने सांगितले. जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत असल्याचा अहवाल आहे. मालमत्तेच्या झालेल्या नुकसानामध्ये अंशतः कच्चे २ घरांचे ९३ हजाराचे नुकसान झाले आहे.

तर अंशतः १२८ पक्क्या घरांचे सुमारे ४३ लाखांचे नुकसान झाले आहे. तीन पूर्णतः गोठ्यांचे ७१ हजार व १३ अंशतः गोठ्यांचे ६ लाख २६ हजाराएवढे नुकसान झाले आहे. पशुधनामध्ये १ जनावर दगावले आहे. एनडीआरएफचे पथक रत्नागिरीत आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, पाणीपुरवठा विभागाचे एक कोटी १३ लाखांहून अधिकचे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषद शाळांचे सव्वा लाखांचे, अंगणवाड्यांचे वीस हजार, जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत रस्ते व संरक्षण भिंतींचे सर्वाधिक ५३ लाखांचे नुकसान झाले आहे. पूल, मोऱ्या, कॉजवेचे दीड लाखाहून अधिक, साकवांचे ३२ हजाराचे नुकसान नोंद झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते व संरक्षण भिंतीचे २७लाखांचे, पूल व मोऱ्यांचे पाच लाखांचे, महावितरणचे १८ लाखांचे नुकसान झाले आहे. पाणीपुरवठा विभागाचे साडेसहा लाखांचे नुकसान झाले आहे.

…तरच स्थलांतराची नोटीस – मुसळधार पावसाने विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आले असून, जुलैमध्ये अतिवृष्टीत धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यास स्थलांतराची नोटीस देण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले. जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular