30.4 C
Ratnagiri
Wednesday, June 11, 2025

मुंबईत ट्रेनचा भयावह अपघात, वेगवान लोकलचे प्रवासी धडाधड कोसळले!

मुंबईमध्ये सोमवारी सकाळी ९.३० वा. च्या सुमारास...

भौगोलिक कामांसाठी ३४ कोटींचा खर्च…

कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शेकडो कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या...

महायुतीच्या हिताला बाधा पोहचू देणार नाही – सुनील तटकरे

रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना...
HomeRatnagiriअपघातामुळे २५ लाखांचे नुकसान, टँकरचालकाविरुद्ध गुन्हा

अपघातामुळे २५ लाखांचे नुकसान, टँकरचालकाविरुद्ध गुन्हा

२५ लाखांहून अधिकच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर निवळी घाटात सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरने मिनीबसला धडक दिल्यानंतर तो उलटून गॅस गळती झाली. या आगीत परिसरातील २ घरे, एक झोपडी आणि साहित्याचे मिळून २५ लाखांचे नुकसान झाले. ‘त्या’ संशयित टँकरचालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी सकाळी आठच्या सुमारास निवळी घाटात जोईल यांच्या घरासमोरील उतारात गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरने मिनीबसला धडक दिली. अपघाताला जबाबदार ‘त्या’ संशयित टँकरचालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राजेश महावीर यादव (भाटी माईस फतेहपूर बेली, दक्षिण दिल्ली) असे टँकरचालकाचे नाव आहे. पोलिसपाटील संजना संजय पवार (रा. निवळी, कोकजेवठार, रत्नागिरी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक राजेश यादव (सध्या रा. चेंबूर, मुंबई) हा गॅस टँकर घेऊन जयगड ते मुंबई असा जात होता.

निवळी घाटात जोईल यांच्या घरासमोरील उतारात समोरून येणाऱ्या मिनीबसला त्याने धडक दिली. ही बसचालक संकेत कृष्णकांत जागुष्टे (रा. चिपळूण) चालवतं होते. अपघातामुळे बसमधील ३० प्रवासी किरकोळ तर गंभीर जखमी झाले. तसेच, गॅसगळतीमुळे संतोष शामराव बेंडखळे यांच्या घर आणि गोठ्याला आग लागून घरातील साहित्य, वाहने, एक म्हैस व गायीचे वासरू भाजून जखमी झाले. तसेच लहू साळुंखे यांच्या टपरीला देखील आग लागून नुकसान झाले. घरासमोर लावलेली रिक्षा, मोटार, दुचाकीचे नुकसान झाले. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित टैंकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघातामध्ये संतोष शामराम बेंडखळे यांच्या घर, साहित्य व गाड्यांचे मिळून साडेसोळा लाखांचे नुकसान झाले आहे. यामध्ये बेंडखळे यांची दुचाकी व मोटार पूर्ण जळून गेली. सुधीर शामराम बेंडखळे यांचे सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले आहे.

त्यांची म्हैस व वासरू जखमी झाले. रिक्षा संपूर्ण जळून खाक झाली. घराचे व आतील साहित्याचे नुकसान झाले आहे. रवींद्र शेट्ये यांच्या घराचे व साहित्याचे मिळून सुमारे एक लाख ४२ हजारांचे नुकसान झाले आहे. लहू दिनकर साळुंखे व रेश्मा लहू साळुंखे यांचेही सुमारे सव्वा लाखाचे नुकसान झाले आहे. या घटनेमध्ये सुमारे २५ लाखांहून अधिकच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तहसीलदार राजाराम म्हात्रे रविवारी दिवसभर घटनास्थळी होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे केले.

महामार्ग १७ तासांनी सुरू – गॅसगळतीमुळे परिसरात धोकादायक स्थिती निर्माण झाली होती. पोलिस यंत्रणेने महामार्गावरील वाहतूक बंद केली होती. छोट्या गाड्या अन्य मार्गावरून वळवल्या. पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्यासह ग्रामीण पोलिस, महामार्ग पोलिस अधिकारी संपूर्ण दिवस व रात्र महामार्गावर तळ ठोकून होते. अग्निशमन यंत्रणाही सकाळपर्यंत महामार्गावर तैनात होती. या टँकरमधील गॅस अन्य टँकरमध्ये भरल्यानंतर बावनदी ते पाली या टप्प्यातील वाहतूक सुमारे १७ तास बंद होती. रात्री १ वाजून २० मिनिटांनी वाहतूक सुरळीत झाली. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला. पर्यायी मार्गावरील रस्ते अरूंद असल्यामुळे तिथून वाहन चालविणे कसरत होत होती. सातत्याने वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले.

RELATED ARTICLES

Most Popular