23.2 C
Ratnagiri
Tuesday, February 10, 2026

दहावी – बारावी परीक्षेपूर्वी बोर्डाचं ‘डिजिटल शस्त्र’

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उत्व माध्यमिक शिक्षण...

रत्नागिरीत ‘जनसुरक्षा’ कवच भक्कम जीवनज्योती विमा

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने...
HomeRatnagiriडॉ. तानाजीराव चोरगे यांची महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड

डॉ. तानाजीराव चोरगे यांची महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड

महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षपदी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, ‘कृषिभूषण’ लेखक डॉ. तानाजीराव चोरगे यांची निवड झाली आहे. या निमित्ताने कोकणला पहिल्याच वेळी उपाध्यक्षपदाचा मान मिळाला आहे.

डॉ. चोरगे यांनी बँकिंग, शिक्षण क्षेत्र, कृषी,कथा, कादंबरी, नाटक आदी विषयावरील चाळीसहून अधिक पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे डॉ. चोरगे यांचे झेप हे सुमारे आठशे पानांचे आत्मचरित्र देखील प्रसिद्ध आहे. हे आत्मचरित्र वाचल्यावर एका सर्वसामान्य माणसाने स्वकर्तृत्वाने विविध अडचणींवर केलेली मात आणि इच्छीलेले साधण्यासाठी घेतलेली सामर्थ्यवान झेप आपणास अनुभवायला मिळते. त्यांच्या आयुष्यातील आलेले विविध प्रकारचे अनुभव त्यांच्या लेखणीतून पुस्तकात उतरलेले आहेत. उत्तम सामाजिक भान असलेल्या डॉ. चोरगे यांचे सहकार क्षेत्रातील काम आदर्शवत आहे.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विकासामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. चिपळूण येथे झालेल्या लेखक प्रकाशक साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले होते. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरानेही शतकोत्तर सुवर्ण महोत्सव निमित्ताने “सन्माननीय सदस्यत्व’ त्यांना प्रदान केले आहे. डॉ. चोरगे यांच्यासह ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि लेखक डॉ. विद्याधर अनास्कर व दिलीपराज प्रकाशनचे श्री. राजीव बर्वे यांचीही निवड उपाध्यक्षपदी केली आहे.

शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि शेतीमध्ये रमणाऱ्या डॉ. चोरगे यांच्या साहित्यिक कार्याच्या गौरवार्थ गुहागर येथील ज्ञानरश्मी वाचनालयाने आपल्या सभागृहाला डॉक्टर तानाजीराव चोरगे सभागृह असे नाव दिले आहे. प्रथमच महाराष्ट्र साहित्य परिषदेची सभा आँनलाईन घेण्यात आली, ही सभा प्रा.मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून, या सभेला प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आणि जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. डॉ. चोरगे यांच्या उपाध्यक्षपदामुळे कोकणातील साहित्यिक चळवळीला बळ मिळेल असा विश्वास साहित्यप्रेमींना असल्याने कोकणातील साहित्य वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular