महाराष्ट्र राज्यातील राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने एक अध्यादेश प्रसिद्ध करून संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना एका परिपत्रकाद्वारे निवडणुकीचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश प्रसिद्धी पत्रकाद्वारे जारी केले आहेत. राज्यातील ज्या नगरपरिषद, नगरपंचायतीची मुदत माहे नोव्हेंबर अखेर संपत आहे. त्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकी घेण्यासाठी अखेर प्रारंभ करण्यात आले आहे. रत्नागिरी नगर परिषद सुद्धा त्यामध्ये सामील आहे. आणि सद्य रत्नागिरीची रस्ते, पाणी सुविधेबद्दल अवस्था पाहता, रत्नागिरीचे रुपडे पालटण्यासाठी कोणीतरी जबाबदार व्यक्तिमत्वानेच पदग्रहण करावे अशी प्रत्येक रत्नागिरीकराची अपेक्षा आहे.
या आदेशामध्ये म्हटले गेले आहे की, ज्या नगरपरिषद, नगरपंचायतीची मुदत नोव्हेंबर मध्ये संपुष्टात येत आहेत, अशा नगरपरिषद, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली काही सदस्यांची मिळून अशी एक समिती गठीत करून वार्ड रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात यावा. प्रभाग रचना पद्धतीमध्ये बदल करण्यात आला असून, एक वॉर्ड हा प्रभाग समजण्यात येणार आहे. सदर आराखडा तयार करत असताना जिल्ह्यातील भौगोलिक बदल, नद्या, नाले, नवीन रस्ते, पूल, इमारती यांचा सारासार विचार लक्षात घ्यावा.
नगरपरिषद, नगरपंचायत अधिसूचनेद्वारे त्यांचे प्रस्तावित क्षेत्र निश्चित करूनच मग नकाशे तयार करण्यात यावेत. आराखडा तयार करण्याची कार्यवाही २३ ऑगस्टपासून सुरू करावी. कच्चा आराखद्याची एक प्रत तात्काळ निवडणूक आयोगाला ई-मेल द्वारे कळविण्यात यावी त्याचप्रमाणे तयार केलेल्या कच्चा आराखड्याबाबत गोपनीयता पाळावी.
रत्नागिरीमधील सामान्य नागरिकांपासून,अनेक विरोधी पक्षांनीदेखील जोपर्यंत स्वच्छ सुंदर रत्नागिरीची स्थिती दिलेल्या उपमेप्रमाणे सुधारत नाहीत तोपर्यंत कोणतीही निवडणूक होऊ देणार नाही असा निश्चयच केला होता. या निवडणुकीमध्ये नक्कीच सत्ताधार्यांना त्यांची योग्य जागा दाखवण्यात येण्याची चर्चाच सुरु होती.