राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. शिंदे– फडणवीस सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. मात्र अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून शिंदे– फडणवीस सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर महागाई, पुरस्थिती, ओला दुष्काळ, ईडीच्या कारवाई विरोधात विरोधकांनी शिंदे– फडणवीस सरकारविरोधात आंदोलनास केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल होताच विरोधकांकडून ‘५० खोके एकदम ओक्के, आले रे आले गद्दार आले’ अशी तुफान घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ईडीच्या कारवाईविरोधातही विरोधकांनी ईडी सरकार हाय हाय…, शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध असो, धिक्कार असो, अशा घोषणाबाजी देखील केल्या.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सकाळी ११ वाजता अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी मुख्यमंत्री एखनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. तसेच जगदीप धनखड यांचेही उपराष्ट्रपती निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. त्यानंतर विधिमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींचे अभिनंदन केले. मुर्मू यांच्यामुळे देशातील स्त्री शिक्षण, स्त्री हक्काला बळ मिळेल अशा भावना अजित पवार यांनी बोलताना व्यक्त केल्या.
पहिल्या दिवशीची घोषणाबाजीनंतर आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असून, आज विरोधक सरकारला विविध मुद्यांवरून पेचात पकडण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्वीटचा मुद्द्यांवरून सरकार आणि विरोधकांमध्ये खंडाजंगी पाहण्यास मिळू शकते.
शिंदे गटाचे ५० आमदार ज्यावेळी विधिमंडळात आले त्यावेळी विरोधी नेत्यांनी आले रे आले गद्दार आले यासह पन्नास खोके एकदम ओके आदी विविध घोषणा दिल्या. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीच काँग्रसेचे छगन भुजबळ, एकनाथ खडसे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यशोमती ठाकूर, अंबादास दानवे सहभागी झाले.

