गरजू आणि गरीब जनतेसाठी कोरोना काळाच्या आधीपासूनच शिवभोजन थाळीचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना काळामध्ये तर या शिवभोजन थाळीमुळे अनेक कामगार कुटुंबाना एक प्रकारचे जगण्याला आधार मिळाला होता. कारण रोजंदारीवर असणारे अनेक मजदूर काम धंदा बंद पडल्याने उपाशी राहण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. परंतु, शिवभोजन थाळीमुळे निदान त्यांचे रोजच्या जेवणाचा प्रश्न तरी सुटत होता.
परंतु, कालांतराने शिवभोजन थाळीच्या वितरण करण्यावरून अनेक गैर प्रकाराची प्रकरणे समोर येऊ लागली. त्याच्या दर्जाबद्दल सुद्धा अनेक विषय कानावर येऊ लागले होते. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शिवभोजन केंद्रांबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार आल्यास अथवा कोणतीही अनियमितता आढळून आल्यास संबंधित केंद्रांची तपासणी करून नियमानुसार कारवाई करावी असे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे, शिवभोजन केंद्राला जागा बदल करण्याविषयी नियमात शिथिलता देण्याबाबत लवकरच शासन स्तरावरून निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले कि, जिल्हा, तालुकानिहाय शिवभोजन केंद्र देताना दिव्यांग तसेच महिलांना प्रथम प्राधान्य द्यावे. जेणेकरून या माध्यमाद्वारे अधिकाधिक गरजू महिलांना रोजगार प्राप्त होऊ शकेल. राज्यात शिवभोजन योजना सर्वात लोकप्रिय ठरली आहे. सर्वसामान्य गरजू नागरिकांना या योजनेचा लाभ व्हावा यासाठी शिवभोजन केंद्रांची नियमित तपासणी करण्यात यावी.
शिवभोजन केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळला तरी तातडीने कारवाई करा, अशा सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या. ई-पॉस मशिनमध्ये आवश्यक बदल करण्यात येतील. याबाबत आलेल्या तक्रारी दूर करण्याचा प्रयत्न करा, असेही भुजबळ यांनी सांगितले. गरजू तसेच नियमात बसत असेल त्याला शिधापत्रिकेचे वितरण करण्याच्या सूचनाही भुजबळ यांनी केल्या.