राज्यातील हवामानामध्ये झपाटय़ाने बदल घडून येत आहेत. रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाली असून, राज्यात गुलाबी थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडय़ामध्ये गारवा मोठ्या प्रमाणात वाढायला लागला आहे. विदर्भामध्येही रात्री हलका गारठा वाढायला सुरुवात झाली आहे.
राज्यात सध्या पाऊस परतला असून पुढील आठवडाभर तरी हवामानाची स्थिती कोरडीच राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे रात्रीचे किमान तापमान सरासरी खालीच राहण्याचा अंदाज असून, दिवसाच्या कमाल तापमानामध्ये काही अंशी वाढ होऊन उन्हाच्या लहरी वाढण्याची शक्यता आहे.
देशात साधारण दिवाळीच्या दिवशी नैऋत्य मोसमी वारे आता माघारी परतले असून, संपूर्ण राज्यातच सध्या कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. त्याच प्रमाणे बहुतांश भागात आकाश निरभ्र झाले आहे. बाष्प कमी झाल्याने पावसाळी स्थिती पूर्ण निवळली आहे. दिवाळीच्या कालावधीत पाऊस विश्रांती घेऊन आकाश निरभ्र होण्याची शक्यता आठवडय़ापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार सध्याची स्थिती आहे. मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागांत, तर कोकणात काही ठिकाणी रात्रीच्या किमान तापमानात घट झाली आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ातही काही भागांत किमान तापमानात घट होत आहे.
पावसाळी स्थिती असताना अगदी दोनच दिवसांपूर्वी राज्यात सर्वच भागांत रात्रीचे किमान तापमान २० अंशांच्या पुढे होते. सध्या सर्वत्र रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या खाली आले आहे. सध्या मध्य महाराष्ट्रात किमान तापमान १२ ते १४ अंशांपर्यंत खाली आले आहे. कोकणात १९ ते २२, मराठवाडय़ात १४ ते १७, तर विदर्भात १७ ते १८ अंशांपर्यंत रात्रीचे तापमान खाली आले आहे. राज्यातील निचांकी तापमान महाबळेश्वर येथे १२.२ अंश सेल्सिअस नोंदिवले गेले आहे.