राज्यातील कोरोनाचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येत असून, पुन्हा सर्व स्थिरस्थावर व्हायला सुरुवात होत आहे. सर्व धर्मांची धार्मिक स्थळे, शाळा, कॉलेज, हॉटेल्स आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालल्याने सुरु झाल्या आहेत.
संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने कोरोनाचे नियम पाळूनच हळू हळू सर्व राज्य आता अनलॉक होत चालले आहे. राज्यात याआधी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स १० वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी होती. आता टास्क फोर्स सोबत झालेल्या बैठकीनंतर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स १२ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसंच, सर्व प्रकारची दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय, २२ ऑक्टोबरपासून अम्युझमेंट पार्क देखील खुली करण्यात येणार आहेत.
कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत असल्याने राज्य सरकारने कोरोना निर्बंधामध्ये अजूनच शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स यांच्या दुकानाची वेळ वाढवण्यात आली असून, ती आत्ता अनुक्रमे रात्री १२ आणि दुकानांची वेळ रात्री ११ वाजेपर्यंत करण्यात आली असून, त्या संदर्भातील विशेष कार्यपद्धती आणि नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे.
यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंट्समधील कर्मचारी तसंच ग्राहकांचं लसीकरण आवश्यक आहे. फेस मास्क तसंच, सॅनिटायझरचा वापरही अनिवार्य आहे. कोरोना आटोक्यात आला आहे तो अजून समूळ नष्ट झाला नाही आहे त्यामुळे, सर्वांनी जबाबदारीने वागून, योग्य प्रकारे आपली आणि आपल्या सभोवतालच्या सर्वांची काळजी घेणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले.