मुंबई-गोवा महामार्गावर हातीवले येथील बंद अवस्थेतील टोलनाक्यावर उभ्या असलेल्या ट्रकला महिंद्रा मराझो कंपनीच्या गाडीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात राजेश शेखर नायडू (३४) रा. मालाड पश्चिम मुंबई हा जागीच मृत्युमुखी पडला. तर या कारमधील अन्य ५ जण जखमी झाले. शुक्रवारी दुपारी १२ वा. च्या दरम्याने हा अपघात झाला. याबाबतची माहिती राजापूर पोलीसांनी दिली. एकूण ६ प्रवाशी या गाडीतून प्रवास करत होते. यातील राजेश शेखर नायडू हे जागीच ठार झाले असून अन्य ५ जण जखमी झाले आहेत. जखमींम ध्ये तृशांत सुरेश शेलार (३२), कुणाल शिवाजी साळुंखे (३९), हर्षदा कुणाल साळुंखे (२८), श्रीकांत महादेव घाडगे (२८, सर्व रा. मालाड पश्चिम मुंबई) यांचा समावेश आहे. जखमींवर उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी कणकवली येथे हलविण्यात आले आहे.
अपघातग्रस्त महेंद्रा मराझो गाडी मुंबईतील मालाडकडून कणकवली भिरकोंडकडे चालली होती. एकूण ६ जण या महिंद्रा गाडीतून प्रवास करीत कणकवली येथे नातेवाईकांकडे ते चालले होते. वाटेत त्यांनी चहा, नाश्ता केल्यानंतर पुढील प्रवास सुरू असताना राजापूरच्या हातीवले येथील बंद टोलनाक्यावर गाडी आली असता तेथून पुढे उभ्या असलेल्या ट्रकला महेंद्रा मराझो गाडीने मागून जोरात धडक दिली. त्यामध्ये महेंद्रा मराझो गाडीतील राजेश शेखर नायडू यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांना तातडीने राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर अन्य ५ जण जखमी झाले.
जखमींना राजापूरमधील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी त्यांना कणकवलीला हलविण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमित यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील, उपनिरीक्षक सुधीर उबाळे, मोबीन शेख व पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमींना सहकार्य करत वाहतूक सुरळीत केली व अपघाताचा पंचनामा केला. या अपघाताची माहिती कळताच मुन्ना खामकर, राजू कुरूप, नरेंद्र कोंबेकर, अरविंद लांजेकर, प्रसाद मोहरकर, महेश कारेकर, संदीप राऊत आदिंनीही अपघातग्रस्तांना मदतीचा हात दिला. स्थानिक ग्रामस्थांनीही जखम ींच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.