२२ जुलै रोजी चिपळूण आणि खेडमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटामुळे चिपळूणवासियांची परिस्थिती भयंकर झाली होती. वाशिष्ठी तसेच जगबुडी नदीला आलेल्या पुरामुळे महापुराची स्थिती निर्माण झाली होती. त्यामध्ये अनेकांचे संसार वाहून गेले तर अनेकांचे सर्वच वाहून गेले. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेली नाम फाउंडेशन ही संस्था चिपळूण येथील वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी नामचे संचालक, मल्हार पाटेकर यांनी रत्नागिरीमध्ये येऊन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची भेट घेत यासंदर्भात सकारात्मक चर्चा केली आहे. त्यांच्यासोबत नाम फाउंडेशनचे विश्वस्त सेवानिवृत्त आयएस अधिकारी इंद्रजित देशमुख, कोकण समन्वयक समीर जानवलकर, संस्थेचे राज्य प्रमुख्य समन्वयक गणेश थोरात देखील उपस्थित होते.
महापुरामुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे दोन्ही तालुक्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून विशेषत: चिपळूण तालुक्याला जोरदार फटका बसला आहे. वाशिष्ठी नदीत जगबुडी नदीचे पाणी येत असल्याने वाशिष्ठीच्या पाणी पातळीत सतत वाढ होत असते. अनेक वर्षांपासून या नद्यांमधील गाळाचा उपसा करण्यात आला नसल्याने, दरवर्षीच नद्यांना पूर येतो. त्यामुळे या शहरांमध्ये बाजारपेठ भागांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी भरते. यावर्षीचा महापुराचा बसलेला फटका मोठ्या प्रमाणावरच होता.
या पूरग्रस्तांना नाम फाउंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विविध रूपांत मदत करण्यात आली. भविष्यात हा धोका टाळण्यासाठी या नद्यांमधील गाळ निघणे गरजेचे असल्याचे लक्षात आल्याने नाम फाउंडेशन पुढे आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सुद्धा सदर प्रस्तावासाठी सकारात्मकता दर्शवली असून, पुढील चर्चा करून नाम फाउंडेशनच्या माध्यमातून झालेल्या कामाची माहिती घेतली. त्याचप्रमाणे नामचे संचालक मल्हार पाटेकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, वाशिष्ठी नदीच्या गाळ उपशासाठी नामकडून मशीनरी उपलब्ध करून दिली जाणार असून, प्रथम जिल्हा प्रशासनाकडून सर्वेक्षण करण्यात यावे. गाळ उपशासाठी आवश्यक असलेल्या लोक सहभागासाठीही जिल्हा प्रशासन प्रयत्नशील राहणार आहे. या संस्थेच्या मदतीने चिपळूण येथील वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा हे महत्त्वपूर्ण काम होणार आहे. पावसाळ्यानंतर प्रत्यक्षात या कामाला सुरुवात होणार असून नियोजनाला सुरुवार करण्यात येणार आहे.