मंडणगड तालुक्यातील ओव्हरलोड वाहनांच्या वाहतुकीमुळे अनेक समस्या निर्माण होत असून, रस्त्यांची देखील चाळण झाली आहे. त्यामुळे हि ओव्हरलोड वाहनांची वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी बरेच दिवस जोर धरत आहे. परंतु, त्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
तर आज अचानक वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या समस्या व रस्त्याची दुरवस्था या संदर्भात तालुक्यातून अनेक तक्रारी प्रशासन व संबंधितांकडे होत आहेत. आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गावर ओव्हरलोड वाहतुकीमुळे पडलेले खड्डे बुजवण्याचे काम गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. रस्त्यावरील खड्ड्यामध्ये लाल चिऱ्यांचे डबर टाकण्यात येत असून त्यावर लाल बारीक खडीचा फक्त मुलामा दिला जात असल्याने रस्त्यावर पडलेले खड्डे नेमके कोण व कशासाठी बुजवत आहे, असा प्रश्न तालुक्यातील जनतेसमोर उपस्थित झाला आहे.
महामार्ग प्राधिकरणाने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे अथवा नाही या विषयी कोणतीही स्पष्टता स्थानिक पातळीवर होऊ शकलेली नाही. त्यामुळे वाहतुकीमुळे सुरू झालेल्या रस्त्याची नासधूस थोपवण्यासाठी वाहतूक ठेकेदारच हे काम करत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
तुळशी येथे धोकादायक पुलास वाहतुकीचा पर्याय देण्यासाठी बायपास रोडचे कामही आज हाती घेण्यात आले. त्यासाठी मशिनरी जागेवर नेण्यात आल्या; त्र पर्यायी रस्त्याचे काम ज्या शेतकऱ्यांच्या जागेतून केले जात आहे त्यांना या संदर्भात कोणतीही पूर्वसूचना प्राधिकरण अथवा संबंधितांकडून देण्यात आलेली नाही आहे. ६ डिसेंबर पासून दिवसभर घडलेल्या घटनाक्रमानंतरही महामार्गावर विविध प्रकारचे कामे प्राधिकरणाच्या आदेशाने सुरू झाली आहेत अथवा नाही याविषयी सुत्रांकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.