वातावरणात होत असलेल्या बदलामुळे, अनेक ठिकाणी वादळ, पाऊस तर काही ठिकाणी वणवे पेटल्याचे दिसून येत आहेत. रत्नागिरी तालुक्यातील हर्चे गोरेवाडी येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये आंबा-काजूच्या तीन बागा जळून खाक झाल्याची घटना शनिवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या लागलेल्या आगीत तीन शेतकऱ्यांच्या बागा जाळून खाक झाल्या असून, एकूण १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महादेव लक्ष्मण गोरे, संजय तुकाराम गोरे व सुरेंद्र सुधाकर नागवेकर असे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
२१ एकर जागेमधील फळधारणा होत असलेली आंबा-काजूची झाडे जळून खाक झाली आहेत. हापूसच्या बागेमधून गेलेल्या महावितरणच्या विद्युत तारांमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने बागेमध्ये आग लागल्याचे पंचनामामध्ये स्पष्ट झाले आहे. सध्या थंडी आणि वारा सुद्धा जास्त असल्याने, आगीने रौद्ररूप धारण केले होते. आग लागल्यानंतर शेतकऱ्यांनी लगेचच बागेच्या दिशेने धाव घेतली. मात्र आगीच्या रौद्ररूपामुळे हापूस-काजूच्या तिनही बागा वाचविणे शक्य झाले नाही.
या बागांची एका महिन्यांपूर्वी फवारणी झाली होती. तसेच त्यामधील हापूसच्या झाडांना फळधारणा झाली होती. तीनही शेतकऱ्यांच्या एकूण २१ एकर जागेतील ४२६ हापूस कलमे तर काजूची ५०० कलमे जाळून मोठे नुकसान झाले आहे. ऐन मोसमामध्ये लागत्या झाडांच्या बागेला आग लागल्याने, बागायतदार हवालदिल झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पं. स. सदस्य संजय नवाथे, कृषी अधिकारी साळुंखे, हर्चे गावचे तलाठी वंजारे, पोलिस पाटील दीपक तरळ यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून पंचनामा करून अहवाल तयार केला आहे.