वानर, माकडांचा त्रास सर्व शेतकऱ्यांना होत असून मी त्यांच्याशी सहमत आहे. शेतकऱ्यांविषयी काहीतरी वाटते, म्हणूनच आज रत्नागिरीत आल्यावर शेतकरी अविनाश काळे यांना भेटायला आलो. राज्याचे वनमंत्री परदेश दौऱ्यावर आहेत, ते आल्यानंतर २० ऑक्टोबरपूर्वी मुंबईत मंत्रालयात बैठक घेऊ. त्यामुळे उपोषण स्थगित करावे, अशी विनंती पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. त्यामुळे काळे यांनी उपोषण स्थगित केले. या वेळी पन्नासहून अधिक शेतकरी उपस्थित होते. अविनाश काळे यांनी गुरुवारपासून (ता. ५) उपोषण सुरू केले होते. त्याला जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. दापोलीतही या विषयासंदर्भात मोर्चा काढण्यात आला होता. वानर, माकडांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांना जगणे मुश्किल झाले आहे.
या प्रश्नासाठी गेल्यावर्षी काळे यांनी एक दिवसाचे उपोषण केले होते. तसेच रत्नागिरीत बैठक घेतली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व अधिकाऱ्यांनाही निवेदने दिली. त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे काळे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. दिवसभरात सुमारे पाचशेहून अधिक शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. परजिल्ह्यातील शेतकरीही काळे यांच्याशी संपर्क साधत होते. आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी काळे यांच्यासमवेत त्यांची आई उषा अनंत काळे, विलास बर्वे, विनायक ठाकूर हे ज्येष्ठ शेतकरीही उपस्थित होते. दरम्यान, आज पालकमंत्री सामंत रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला जाण्यापूर्वी दुपारी १२ च्या दरम्यान काळे यांची भेट घेतली.
या प्रसंगी काळे यांनी सांगितले की, हिमाचल प्रदेशमध्ये वन्य प्राणी नीलगायींचा त्रास होत असल्याने सरकारने अध्यादेश काढला. बिहारमध्येही माकडांमुळे त्रास होत असल्याने त्यांना तेथील सरकार मारत आहे. महाराष्ट्रातही अशा प्रकारे कायदा करण्यात यावा. यापूर्वी निवेदने देऊनही त्याला उत्तरसुद्धा देण्यात आले नाही. त्यावर मंत्री सामंत म्हणाले, ‘वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे जपानच्या दौऱ्यावर आहेत. ते ११ तारखेला आल्यानंतर पुढील आठ दिवसांत त्यांच्यासमवेत काळे व रत्नागिरीतील शेतकऱ्यांची बैठक घेऊ त्यातून मार्ग निघेल. तोपर्यंत उपोषण स्थगित करावे. मंत्र्यांच्या आश्वासनानंतर अविनाश काळे यांच्यासह उपोषणाला बसलेल्यांनी पाणी पिऊन उपोषण सोडले. या प्रसंगी तिथे अन्य शेतकरी आणि शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, बाबू म्हाप, मालगुंडचे श्री. साळवी आदी उपस्थित होते.