रत्नागिरी शहरातील खालच्या भागामध्ये मिरकरवाडा व परिसरातील भागांना कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांची गैरसोय तत्काळ दूर करुन चोवीस तास पाणी पुरवठा करावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी न. प. मुख्याधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील मिरकरवाडा, खडपमोहल्ला, पांजरी मोहल्ला, चरकरवाडी, मुरुगवाडा, पेठकिल्ला या भागांवर अन्याय होत आहे. या भागांना सध्या एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. साळवी स्टॉप ते किल्ला येथील पाण्याची टाकी ग्रॅव्हिटीने जोडण्याचे काम सुरू आहे. हे काम लवकर पूर्ण करुन पांढरा समुद्रावरील टाकीपर्यंत जोडल्यास पाण्याचा प्रश्न सुटू शकतो व जनतेला मुबलक पाणीही मिळू शकते. याबाबत वारंवार पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती कीर यांनी निवेदनात दिली आहे. मुख्याधिकार्यांची भेट घेऊन त्यांनी पाण्याची वस्तुस्थिती सांगितली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नीलेश भोसले, साजिद मुन्शी, मजीद सोलकर, शब्बीर मुकादम उपस्थित होते.
त्यावर दोन दिवस आधीच पालिकेने रत्नागिरीमध्ये सुरु असलेल्या पाणी पाईप लाईनच्या कामाबद्दल सांगितले होते. रत्नागिरी शहराच्या पाणी योजनेचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. येत्या पंधरा दिवसांत शहरातील चौदा टप्प्यातील सर्व कामे पूर्णत्वास नेण्याचे प्रयत्न पालिका प्रशासनाकडून सुरू आहेत. तीन टप्प्यातील पाणी योजनेची कामे शिल्लक असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून रत्नागिरी शहराला नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. प्रत्येक प्रभागाला पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. साळवी स्टॉप ते मिर्यापर्यंतच्या भागात नवीन योजनेचे काम सुरळीत व्हावे, यासाठी चौदा टप्पे करण्यात आले होते. त्यापैकी अकरा टप्प्यांचे काम पूर्ण झाले आहे. अजूनही शहरातील खालच्या परिसरातील तीन टप्पयातील काम पूर्ण होणे शिल्लक आहे. पंधरा दिवसांत शहरातील चौदाही झोनची कामे शंभर टक्के पूर्ण होतील.