प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या कार्यप्रणालीवर गंभीर शंका उपस्थित करत थेट निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. तसेच, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चचांवरही त्यांनी आपले स्पष्ट मत मांडले आहे. माजी मंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत सोमवारी दिव्यांग शेतकरी, आंबा बागायतदार, मच्छिमार यांचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी ईव्हीएममुळे लोकशाहीवर आणि मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्याचा आरोप केला. काँग्रेसने ईव्हीएम आणली नसती तर हे पाप आमच्या म ाथी लागलं नसतं, अशा शब्दांत त्यांनी ईव्हीएमच्या वापराला विरोध दर्शवला. ईव्हीएममुळे सध्या अशी अवस्था झाली आहे की, लोकांना मत मागायला जावं की न जावं, हेच कळत नाही, असे ते म्हणाले.
माजी मंत्री बच्चू कडू यांनी मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क सिद्ध करता यावा यासाठी व्हीव्हीपॅट स्लिप मतदारांच्या हाती मिळण्याची मागणी केली आहे. जे स्क्रीनवर दिसते ते व्हीव्हीपॅट आमच्या हाती आले पाहिजे. खऱ्या अर्थाने प्रभू रामचंद्रांचे भक्त असतील तर, व्हीव्हीपॅट आमच्या हाती देतील असा टोला देखील त्यांनी लगावला. त्यावर आमचे नाव, सही, क्रमांक असला पाहिजे. ते व्हीव्हीपॅट हाती आले की, मतपेटीत टाकले पाहिजे, अशी ठोस भूमिका त्यांनी मांडली. माझे मत कुठे गेले हे सरकारला, निवडणूक आयोगाला दाखवताही येत नाही, असे आव्हानच त्यांनी दिले. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवरही बोट ठेवत अत्यंत खळबळजनक विधान केले. निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतो, असा थेट आणि गंभीर आरोप त्यांनी केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चावर बोलताना बच्चू कडू यांनी ‘अजेंडा’ महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त केले. झेंडा जरी असला तरी अजेंडा काय आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

