‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ दिल्यानंतर मी निष्ठा सोडली, यांच्या डोक्यात हवा गेल्याची टीका काही जणांकडून केली जाते; परंतु तशी वस्तुस्थिती नसून मी घेतलेला निर्णय माझ्या स्वतःसाठी नसून जनतेच्या अन् मतदारसंघाच्या विकासासाठी आहे. त्यामुळे कोणाच्या टीकेकडे लक्ष न देता मतदारसंघाचा विकास करणे, हेच आपले ध्येय आहे,’ असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले. चिपळूण मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद गटनिहाय मुंबईकर चाकरमान्यांचे मेळावे घेण्याचे नियोजन आमदार निकम यांनी केले आहे. याची सुरवात ओझरे गटापासून झाली.
दादर येथे ओझरे गटाचा मुंबईस्थित मेळावा झाला. आमदार निकम म्हणाले, ‘सर्वांच्या आशीर्वादाने आमदार झालो. ‘कोरोना, महापूर यामुळे विकासकामात अडचणी आल्या. सत्तांतरामुळे काम करताना खूप अडचणी येत होत्या. ओझरे गटात १०२ कोटी ६० लाखांचा निधी मिळाला. वाडी-वस्तीत रस्ते, पाखाड्या झाल्या म्हणजे विकास झाला, असे नाही. उद्योगधंदा करण्यासाठी मतदारसंघातील तरुणांच्या गाड्या रस्त्यावरुन धावतील. तेव्हाच या केलेल्या विकासकामाचे सार्थक झाले, असे समजेन.
यासाठी ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून नद्याचे पाणी गावागावात पोहचविणे आवश्यक आहे, पर्यटन विकास करणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. एका जिल्हा परिषद गटासाठी कोट्यवधीपेक्षा जास्त निधी खर्च करणे ही भाग्याची गोष्ट आहे. ‘ मेळाव्याला मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, प्रदेश सरचिटणीस बाप्पा सावंत, अजित यशवंतराव, जयंद्रथ खताते, संगमेश्वर तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, माजी सभापती पूजा निकम, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, सुशिल भायजे, पंकज पुसाळकर आदी उपस्थित होते.