मागील काही वर्षांपासून रत्नागिरी शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्रत्येक वर्षी खर्च करावा लागत आहे. दोन वर्षे नव्हे तर साधा एक वर्षभरही रस्ता टिकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीचे कारण देऊन याला दरवर्षी बगल दिली जाते. दरवर्षी शहर आणि परिसरात साडेतीन हजार मिमीच्या वर पाऊस पडतो. त्यामुळे त्याचा विचार करून ठेकेदारांनी त्या दर्जाचे रस्ते बनवण्याची गरज आहे; परंतु तसे होताना दिसत नाही.
त्यामध्येच शहरामध्ये सुधारित पाणी योजनेच्या कामासाठी तयार रस्त्यांची खोदाई केल्याने शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. ठिकठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातील मलमपट्टी करण्यात आली आहे. पण नवीन मजबूत चांगल्या दर्जाचे रस्ते बनवणे आवश्यक बनले आहे. रस्त्यांवर वारंवार कोट्यवधीचा निधी खर्च होतो आणि पुन्हा तो पाण्यात जातो.
खराब रस्त्यांमुळे जनतेत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार रस्ते खराब होत असल्याने उद्योगमंत्री उदय सामंत काँक्रिटी करणाच्या दृष्टीनेच आग्रही होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे शहराला हा निधी मिळाला आहे. परंतु, मंजूर निधीपैकी १५ टक्के रक्कम म्हणजे १४ कोटी ५५ लाख पालिकेला भरावे लागणार आहेत. पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने पालिका एवढे पैसे कसे उभारणार हा प्रश्न आहे.
याचा विचार करता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नगरोत्थानमधून ९७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यातून १० रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून पालिकेवर मोठा आर्थिक बोजा असल्याने पालिकेची आर्थिक स्थिती बेताची बनली आहे. त्यामुळे या ९७ कोटींपैकी पालिकेला १५ टक्के म्हणजे १४ कोटी ५५ लाखांचा निधी उभा करावा लागणार आहे. या स्थितीमध्ये पालिकेला हे शक्य नसले तरी प्रशासनाकडून काही हालचाली सुरू झाल्या आहेत. स्वनिधी किंवा कर्ज असे दोन पर्याय पालिकेपुढे आहेत. त्यापैकी एकाचा वापर करून हे विकासकाम करून घेतले जाणार आहे. त्यामुळे शहरातील हे काँक्रिटीकरण होणार हे निश्चित झाले आहे.