चिपळूण येथे नाम फाऊंडेशनचे संस्थापक सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी भेट दिली असता, येणाऱ्या काही दिवसात शिवनदी गाळमुक्त होईल व पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यात चिपळूण शहराला कोणताही त्रास होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. शिवनदी गाळ उपसाचा शुभारंभ नाम फाऊंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी रत्नागिरी डॉ. बी. एन. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
नाना पाटेकर पुढे म्हणाले की, नद्यांचा गाळ उपसणे, हे काम एकट्या नामचे नाही. सर्वांनी करायचे आहे. नाम तुमच्या सहकार्यातूनच काम करीत आहे. गाळ काढण्याच्या या शुभारंभ प्रसंगी काही सामाजिक संस्थांनी नामला आर्थिक मदतीचा हात दिला. चिपळूणवासियांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी आभारी आहे. तरुण मुलांनी गावात राहायला पाहिजे. आपल्या गावाची जबाबदारी स्वीकारायला हवी. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी अशी अधिकारी मंडळी खूप चांगले काम करीत असल्याचे सांगून श्री.नाना पाटेकर यांनी त्यांच्या कामाची प्रशंसा केली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.बी. एन. पाटील, जलसंपदा विभागाच्या अभियंता अश्विनी नारकर, नाना पाटेकर यांचे सुपुत्र मल्हार पाटेकर, प्रांताधिकारी प्रविण पवार, तहसिलदार जयराज सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, शिरीष काटकर, अरुण भोजने , शहानवाज शहा , किशोर रेडीज, नामचे कोकण समन्वयक समीर जानवलकर, चिपळूण समन्वयक महेंद्र कासेकर, माजी सभापती पूजालाई निकम, बचाव समितीचे बापू काणे, रामशेठ रेडीज, उदय ओतारी, माजी उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने, अश्विनी भुस्कुटे, पालिकेचे प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, प्रमोद साळे इत्यादी संबंधित उपस्थित होते.
चिपळुणात महापुरानंतर वाशिष्ठी व शिव नदीतील गाळ काढावा व शहर पूरमुक्त व्हावे यासाठी चळवळ उभी राहिली. चिपळूण बचाव समितीने त्यासाठी २९ दिवस साखळी उपोषण केले होते जे कालच स्थगित करण्यात आले. शासनाच्या माध्यमातून वाशिष्ठीमधील गाळ काढण्याचे काम सुरू झाले आहे. आता नाम फाऊंडेशनच्यावतीने सात कि.मी. पर्यंत शिव नदीतील गाळ काढण्याचा शुभारंभ दि. ४ रोजी बायपास येथील पुलाजवळ झाला.