रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील नाणीज बाजारपेठ येथे सोमवारी सकाळी अचानक एक धक्कादायक प्रकार घडल्याने गावकरी घाबरून गेले आहेत.पाली ते नाणीज मार्गावर अनेक शाळा आहेत आणि त्या विद्यार्थ्याची वाहतूक देखील राजरोस सुरु असते. या मार्गावरील वीज वाहिनीवर दोन झाडे उन्मळून पडल्याने वीज खांब विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका खाजगी वाहनावर एम.एच.०८ एपी १२८६ पडला. हा प्रकार समोर दिसताच स्थानिक ग्रामस्थ तातडीने मदतीला धावले आणि विद्यार्थी व वाहनचालकाला वाहनातून सुखरूपपणे बाहेर काढले.
या घटनेची महावितरणकडूनही तातडीने गंभीर दखल घेत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन प्रत्येकाची विचारपूस करण्यात आली. या दुर्घटनेत वाहन चालकासह विद्यार्थीही थोडक्यात बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाली व साखरपा या दोन उपकेंद्राना जोडणारी आणि सद्यस्थितीत बंद अवस्थेत असलेली मात्र पर्यायी वीज व्यवस्था करण्यासाठी उच्चदाब वीज वाहिनी नाणीज परिसरात आहे. या वीज वाहिनीवर वादळी वाऱ्यामुळे गुलमोहर व आंबा हे दोन जुने वृक्ष उन्मळून पडल्याने वीज खांब विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या खाजगी स्कूल बसच्या समोरील भागावर आदळला.
ग्रामस्थ व महावितरण कर्मचाऱ्यांनी एकमेकांच्या सहाय्याने बहर रस्त्यातून वीज खांब हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला. उपकार्यकारी अभियंता ओंकार डांगे, पालीचे शाखा अभियंता धनाजी कळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कामकाज पाहिले. तसंच विद्युत निरीक्षक यांना घटनेची माहिती कळवण्यात आली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत काही विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली, डॉ.संदिप रसाळ यांनी तपासणी केली असून सर्व विद्यार्थी व चालक सुखरूप असल्याची माहिती त्यांनी दिली.