नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटप्रमुखांच्या मेळाव्याला उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. नारायण राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे केवळ बढाई मारतात. आदिलशाह, अफजल खान, अमूक-तमूक आणि हे शाह असा त्यांचा इतिहास आहे. असं बोलताना यांना काहीच वाटत नाही का? अशी टीका म्हणजे एक प्रकारे गुन्हा आहे. उद्या संजय राऊत यांचा सोबती म्हणून यांना देखील तुरुंगात जावं लागेल. गिधाड वगैरे कुणाला उद्देशून बोलले आहात? ही वक्तव्य नक्कीच तुरुंगाचा रस्ता दाखवणारी असल्याचे राणे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यातील भाषणाला उत्तर देण्यासाठी नारायण राणे यांनी विशेष करून ही पत्रकार परिषद बोलवली होती. पुढे बोलताना ते म्हणाले, तुम्ही अजून सुटला नाही, ईडी तुमच्या मागे आहे आणि आदित्यही सुशांत सिंह राजपूत घातपात प्रकरणात तुरुंगात जाणार, असा सूचक इशाराच राणे यांनी उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
यासोबतच राणेंनी यावेळी बाप चोरांची टोळी मुद्यावरही पडखर भाष्य केले आहे. अडीच वर्ष सत्तेत असताना त्यांनी किती गटनेत्यांना भेटी दिल्या, त्यांना किती मदत केली? बाळासाहेबांसारख्या वडिलांचं धोरण पाळू न शकणाऱ्या मुलाची दशा पाहून आम्ही स्वताहून पक्षातून बाहेर पडलो, याला चोरी केली असं म्हणत नाहीत. असही कडक शब्दांत सुनावलं. बाळासाहेब आयुष्यभर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत लढले, यांनी मुख्यमंत्रीपदासाठी कधीही त्यांचे विचार घेतले नाहीत. विरोधी पक्षाच्या मोठ्या नेत्यांना हे गिधाडं म्हणाले, हा लबाड लांडगा आहे अशा शब्दात टीकाही राणेंनी केली आहे.
तसेच, राहिला विषय खोक्यांचा, तर त्याची चौकशी ही होणारच आहे. त्यातून उद्धव ठाकरेंची सुटका झालेली नाही आणि होणार देखील नाही. सुशांत सिंह राजपूत प्रकरणातूनही तुमच्या मुलाची सुटका अद्याप झालेली नाही. आदित्य ठाकरे तर एकदा तुरुंगात गेल्यावर बाहेर पडण कठीण आहे, असा इशारा राणेंनी ठाकरेंना दिला.