केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या सुरु असलेल्या जन आशीर्वाद यात्रेला आता हिंसक वळण लागले आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे, बुधवार, २५ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा राजापुरात दाखल होणार असून, एस. टी. डेपोसमोर होणाऱ्या स्वागत समारंभानंतर राणे तालुक्यातील विविध संघटनांशी संवाद साधणार आहेत.
तालुक्यातील विविध रिफायनरी समर्थक संघटनांचे पदाधिकारी बुधवारी तालुक्यात बारसू, सोलगाव, गोवळ परिसरात प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा, यासाठी राजापुरात केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेणार असल्याची माहिती रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार यांनी पत्रकारांना दिली आहे.
ॲड. शशिकांत सुतार यांनी पुढे बोलताना सांगितले कि, नाम. नारायण राणे यांच्याकडे केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग खाते असल्याने त्याचा फायदा नक्कीच कोकणाला होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून या मंत्रालयाशी निगडीत अन्य पूरक उद्योग, व्यवसाय राजापूर तालुक्यात यावेत आणि बेरोजगार तरूण-तरूणी, महिला बचतगट, छोटे व्यावसायिक यांना रोजगाराची संधी निर्माण व्हावी, अशी मागणी सर्व समर्थक संघटना करणार असल्याचे ॲड. सुतार यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांची भेट घेऊन प्रकल्पाच्या अमलबजावणीचे एक निवेदन समर्थक संघटनांतर्फे देण्यात येणार असल्याचे सुतार यांनी सांगितले. बारसू परिसरात प्रकल्पासाठी पुरेशी जागा उपलब्ध असून, स्थानिक ग्रामस्थांचाही प्रकल्पाला पाठिंबा असून, हळू हळू अनेक ग्रामपंचायतींही समर्थन दर्शवण्यास पुढे सरसावत आहेत. त्यामुळे संपूर्ण कोकणासाठीच उपयुक्त ठरणार्या प्रकल्पावर लवकरात लवकर शिक्कामोर्तब व्हावे अशीच सर्व समर्थकांची इच्छा आहे.