नारायण राणे आणि त्यांची मुले विरुद्ध शिवसेना यांमध्ये सुरु असलेली तू तू मै मै कधीही आणि कुठेही सुरु होते. यांच्यातील वाद संपुष्टात येण्याची काहीच चिन्ह दिसून येत नाही. रोज कोणत्या न कोणत्या कारणावरून त्यांची शाब्दिक बाचाबाची सुरुच असते. नारायण राणेंनी काही दिवसांपूर्वी बारामतीत झालेल्या एका इन्क्युबेशन सेंटर उद्घाटनप्रसंगी उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणावरून चांगलाच नेम धरला.
“मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की फटाके वाजवा, पण धूर सोडू नका आणि आवाजही करू नका. असे फटाके फक्त आघाडी सरकारच्याच दुकानात मिळतात. असाच एक धूर बारामतीला सोडण्यात आला. त्याला आवाजही नव्हता, धूरही नव्हता, फक्त वास होता. त्यामुळे लोक पुन्हा एकदा प्रदूषणाधीन झाले आहेत, असं राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, यावेळी नारायण राणेंनी संजय राऊतांना देखील सूचक टोला लगावला. “गेले दोन दिवस संजय राऊतांचा अग्रलेख मी वाचला. देशात विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुका झाल्या. यात एक जागा दादरा-नगर हवेलीची अपक्ष उमेदवाराने जिंकली. शिवसेनेने डंका सुरू केला की राज्याच्या बाहेर देखील आम्हीच जिंकलो, आमचीच सत्ता आली. मुद्दाम मी त्या उमेदवाराची निशाणी मागवून घेतली. ती फलंदाज बॅट घेऊन उभा असल्याची आहे. पण दुसऱ्यांच्या मुलाचे बारसे करायची सवय शिवसेनेला आहेच.
कमला डेलकर निवडून आल्या. त्याचं मातोश्रीवर बोलवून आगत स्वागत करण्यात आले. त्याबद्दल शिवसेना आम्हाला यश मिळालं, आता पुढील विजय दिल्लीमध्ये असेल, दिल्ली काबीज करणार म्हणत आहेत, लिखाण करताना त्या व्यक्तीला भान राहिले नसेल. जे रात्री करायचं ते दिवसा केल्यामुळे संजय राऊतांबाबत असा परिणाम होतोय का याबद्दल मला काही माहीत नाही”, असा सणसणीत टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावला.