कोकण किनारपट्टी आणि ईशान्य भारत, जिथे नारळाचे उत्पादन उत्कृष्ट प्रकारचे येते अशा ठिकाणी नारळाच्या काथ्याचा उद्योग विकसित करण्याची आणि त्याच्या बाजारपेठेचे जाळे निर्माण करण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले आहे.
काथ्या उद्योग हा पारंपरिक, कृषी संलग्न श्रम केंद्री आणि निर्यातक्षम उद्योग असून, टाकावू कचऱ्यापासून काहीतरी उपयुक्त निर्माण करणारा हा उद्योग असून, यासाठी वापरला जाणारा, कच्चा माल एरवी निरुपयोगी म्हणूनच फेकून दिला जातो. या व्यवसायात असलेल्या मनुष्यबळाची कौशल्ये अद्यायवत करण्याची, तंत्रज्ञान विकास, प्रक्रियेत सुधारणा, पायाभूत सुविधांचे पाठबळ, पत पुरवठा, विपणन क्षमता अशा सर्व उपाययोजना केल्यास, देशभरातील काथ्या उद्योगाचा निश्चितच चांगला विकास होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गुजरात केवडिया मध्ये काथ्या मंडळाची २३८ वी बैठक पार पडली, त्यामध्ये ते बोलत होते. कोकण किनारपट्टी भागामध्ये चांगल्या प्रतीच्या नारळाचे उत्पादन मुबलक प्रमाणामध्ये होते, आणि नारळ हा एवढा उपयुक्त आहे कि, त्याच्या खोबऱ्यापासून ते काथ्यापर्यंत सगळ्याच गोष्टी उपयोगी ठरतात. त्यामुळे अशा उत्पादन जास्त येणाऱ्या भागांमध्ये काथ्या उद्योग विकसित करण्यास वाव असल्याचे ते म्हणाले.
भारताचा वाटा जगाच्या एकूण काथ्या उत्पादनात ७०% इतका आहे तर, जागतिक व्यापारात ८० % एवढा आहे. ग्रामीण भागामध्ये जास्त करून ८० टक्के महिला वर्गाला या काथ्या उद्योगाच्या माध्यमातून ७.३ लाख लोकांना रोजगार प्राप्त झाला आहे. हा उद्योग अधिकाधिक स्पर्धात्मक, स्वयंपूर्ण आणि ग्रामीण जनतेला रोजगार पुरवण्यास सक्षम होईल, असे प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.
त्याचप्रमाणे काथ्या हा पर्यावरण पूरक असल्याने, त्याच्या पासून तयार होणाऱ्या उत्पादनांना मागणी वाढती आहे. २०२०-२१ हे वर्ष कोरोनाच्या संकटात गेले, पण त्या काळामध्ये सुद्धा काथ्या आणि काथ्यापासून तयार झालेल्या उत्पादनांची निर्यात कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. या आर्थिक मंदीच्या काळात देखील काथ्याच्या व्यवसायाला उर्जितावस्थाच होती, असेही त्यांनी विशेष नमूद केले.