सागरी पोलीस ठाणे नाटेतील पोलीसांनी पुन्हा एकदा दक्षता आणि तपासकौशल्य सिध्द करत अवघ्या १२ तासांच्या आत तब्बल १ लाख ४७ हजार २०० रूपये किंमतीचे ४६० किलो वजनाचे चोरलेले शिसे हस्तगत केले असून या चोरीत सहभागी असलेले २ संशयित आरोपी ताब्यात घेतले आहेत. या कारवाईमुळे किनारी भागात अलीकडे वाढलेल्या चोरीच्या घटनांवर आळा बसणार आहे. पोलीसांकडून पत्रकारांना देण्यात आलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सागरी पोलीस ठाणे नाटे येथे भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मौजे कातळीसडा येथे घडला. फिर्यादी नासिर इसहाक मजगावकर (४७, रा. कातळी) यांनी तक्रार दिली की, चंद्रशेखर रजनिकांत कुश्ये (रा. मेढा ता. मालवण) यांच्या मालकीचे पर्सनेट मच्छीमारी जाळे त्यांनी दुरूस्तीसाठी आणून कातळीसडा येथील शब्बीर नाखरेकर यांच्या कंपाऊंडमध्ये काळ्या ताडपत्रीने झाकून ठेवले होते. तथापि दि.१६ सप्टेंबर रोजी त्यांनी तपासणी केली असता जाळयातील सुम ारे ६४० किलो वजनाचे शिसे चोरीस गेलेले आढळले. त्यानंतर त्यांनी सागरी पोलीस ठाणे नाटे येथे तक्रार नोंदवली.
तक्रार प्राप्त होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान तांत्रिक साधनांचा वापर आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर संशयित आरोपी म्हणून मुविना अब्दुल सत्तार सोलकर (३०, रा. घालवली मुस्लिमवाडी ता. देवगड, सिंधुदुर्ग), समिर कुदबुद्दिन सोलकर (रा. कातळी ता. राजापूर, जि.रत्नागिरी) या दोघांना केवळ १२ तासांच्या तपासानंतर पोलीसांनी ताब्यात घेतले. सखोल चौकशीत दोघांनी गुन्हा कबूल केल्याची माहिती पोलीसांनी पत्रकारांना दिली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून १ लाख ४७ हजार २०० रूपये किमतीचे (४६० किला वजनाचे) पर्सनेट मच्छिमारी जाळयाचे शिसे जप्त करण्यात आले. (दर प्रति किलो २३०रू. प्रमाणे) सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी यापूर्वी क्राईम ब्रंच रत्नागिरी शाखेत पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेले असून त्या काळात मिळवलेला गुन्हेगारी तपासाचा अनुभव व तांत्रिक माहितीचा सखोल वापर यांनी या प्रकरणात प्रभावीपणे केला.
त्यांच्या कुशल तपास कौशल्यामुळे आणि योग्य दिशेने मार्गदर्शनामुळे हा गुन्हा अवघ्या १२ तासात उघडकीस आला. ही कारवाई पोलीस अधिक्षक चि पो.कॉ. जाधव पो.कॉ. बांदकर नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधिक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम तसेच पोलीस निरीक्षक नितीन ढेरे (स्था.गु.शा. रत्नागिरी) यांच्या थेट मार्गदर्शनाखाली झाली. तपास पथकात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय झगडे, पो.कॉ. पाटील (क्र.४१०), (क्र.१३५९), पो.कॉ. कुसाळे (क्र.३३४) व (क्र.१५७८) यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. दरम्यान दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय झगडे हे करीत आहेत. किनारी भागातील मच्छिमार व नागरीकांनी सागरी पोलीस ठाण्याच्या या जलद कारवाईचे कौतुक केले आहे. चोरीला गेलेला मुद्देमाल पूर्णपणे हस्तगत झाल्यामुळे मच्छीमार समुदायाला दिलासा मिळाला असून पोलीसांवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.