क्रुझ ड्रग्ज प्रकरण अजूनच चिघळत चालले असून, अनेक नवनवीन गोष्टी रोज समोर येऊ लागल्या आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप करणे सुरु आहेत.
नवाब मलिक यांचे समीर वानखेडे यांच्यावर दररोज नवनवीन होणारे आरोप थांबतच नाहीत. समीर वानखेडे यांच्या कडूनही त्यांना वेळोवेळी प्रत्युत्तरं दिले जात आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर सर्वात मोठा आरोप केला म्हणजे, समीर वानखेडे जन्मानं मुस्लीम आहेत त्याचप्रमाणे, जातीच्या बोगस कागदपत्राद्वारे समीर वानखेडे यांनी ही नोकरी मिळवली आहे. त्याचप्रमाणे, समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव ज्ञानदेव नसून दाऊद वानखेडे असल्याचा गंभीर आरोप करून एकच खळबळ मलिक यांनी उडवून दिली आहे.
मलिकांच्या राजरोसपणे सुरु असलेल्या बदनामीकारक आरोपा विरोधात समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी अखेर कोर्टाचे दार ठोठावले आहे. त्यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये १ कोटी २५ लाखाचा मानहानीचा दावा ठोकला आहे.
मंत्री नवाब मलिक त्यानंतर आरोपाचे सत्र सुरूच ठेवले. ज्ञानदेव वानखेडे यांच्या आधी भाजप नेता मोहित कंबोज यांनीही नवाब मलिक यांच्यावर १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे. नवाब मलिक यानी वारंवार एका पाठोपाठ आरोप आणि प्रश्न उपस्थित केल्यानंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची देखील एनसीबी पथकामार्फत चौकशी सुरु करण्यात आली आहे.
नवाब मलिक दररोज सोशल मिडीयाच्या आधारे वानखेडे कुटुंबाची नाहक बदनामी करत आहेत. नवाब मलिक यांच्या सततच्या आरोपांमुळे वानखेडे कुटुंबाला प्रचंड मानसिक आणि सामाजिक त्रासाने त्रस्त झाले आहेत. ज्ञानदेव वानखेडे यांनी सांगितले कि, पूर्ववैमन्यसातून नवाब मलिक, समीर वानखेडे आणि आमच्या कुटुंबाला बदनाम करत सुटले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आत्ता धमक्याही मिळू लागल्या आहेत. मलिक त्यांच्या जावयाला क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर, नवाब मलिक हे बिनधोकपणे समीर वानखेडे आणि कुटुंबावर सरसकट आरोप करत सुटले आहेत जे अजूनही थांबलेले नाहीत.