संपूर्ण रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाची दुरवस्था झाली आहे. धरणाला पन्नास टक्के गळती लागल्याची धक्कादायक माहिती पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये समोर आली आहे. पाटबंधारे विभाग धरणाच्या दुरुस्तीचा ठराव करून याबाबतचा प्रस्ताव तयार करणार आहे.
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाला लागलेल्या पन्नास टक्के गळतीबाबत वेळीच त्याच्या दुरुस्तीसाठी व्यवस्था झाली नाही तर मुख्य जलवाहिनीवर केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून या धरणाच्या दुरुस्तीसाठी भरीव निधीची मागणी करू, असे नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी सांगितले. पालिका सभागृहामध्ये एकमताने तसा ठराव घेण्यात आला.
पावसाळा आणि उन्हाळ्यामध्ये शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी या धरणाचा मोठा वापर केला जातो. शिळ धरणामधून होणारा पुरवठा काही महिने स्थिर राहतो. धरण बांधल्यापासून आजपर्यंत पानवल धरणातील गाळाचा उपसा करण्यात आलेला नाही किंवा त्याची कोणतीही लहान डागडुजी अथवा मोठी दुरुस्तीही करण्याची वेळ आलेली नाही. पण आता मात्र या धऱणाला सुमारे ५० टक्के गळती लागली असल्याची माहिती नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी सर्वसाधारण सभेत दिली.
यापूर्वी फक्त या धऱणाची मुख्य जलवाहिनी बदलण्यात आली होती. त्यासाठी २५ ते ३० लाखाहून अधिक खर्च आला आहे. धरणाची दुरुस्ती झाली तर नवीन बसविलेल्या जलवाहिनीचा काहीच फायदा होणार नाही. हा खर्च निव्वळ फुकट जाईल, असे नगराध्यक्ष साळवी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लवकरच पानवल धऱणाच्या दुरुस्तीच्यादृष्टीने पावले उचलण्यात येणार आहेत.