भारताचा शेजारील देश नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी अस्थिरता निर्माण झाली आहे. या कालावधीत अनेक नेपाळी गुन्हेगार आंदोलनाचा फायदा घेऊन पळून गेले आहेत. ते आश्रयासाठी कोकणातील आंबा बागायतदार व मच्छीमारांकडे नोकरीनिमित्ताने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्याने येणाऱ्या नेपाळी व्यक्तीची माहिती पोलिसांकडे नोंदवावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच पोलिसपाटलांनी याकडे गांभीयनि लक्ष द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सप्टेंबर २०२५ मध्ये नेपाळमधील जनतेने प्रस्थापित सरकारविरोधी आंदोलन केले होते. त्यावेळी नेपाळी जनतेने उत्स्फूर्तपणे उठाव करून शासकीय इमारतींची तोडफोड करणे, जाळपोळ करणे अशा स्वरूपाचे आंदोलन केले. या आंदोलनाचा फायदा घेऊन नेपाळ देशातील वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांची शिक्षा भोगत असलेले सुमारे १३ हजार कैदी तुरुंग फोडून पळून गेल्याची बातमी विविध माध्यमांमध्ये प्रसारित झालेली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात नेपाळमधून मच्छीमार बोटमालक, आंबा व्यावसायिक, हॉटेल व्यवसाय, चायनीज सेंटर तसेच चिरे खाणमालक यांच्याकडे मजुरीच्या कामाला येत असतात. नेपाळमधील तुरुंगामधून पळून गेलेले कैदी त्यांचे अस्तित्व लपवण्यासाठी कामधंद्याच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यात येऊन वास्तव्य करण्याची शक्यता असल्याने नेपाळमधील कोणीही व्यक्ती मच्छीमार,आंबा व्यावसायिक यांसह अन्य ठिकाणी मजुरीच्या कामासाठी ठेवताना त्यांचे नाव व गावाची पूर्ण खात्री करूनच ठेवण्यात यावे. सर्व नेपाळी नागरिकांची मैत्री अॅपमध्ये १०० टक्के नोंदणी करावी. कामासाठी ठेवलेल्या प्रत्येक नेपाळी नागरिकाची फोटोसह माहिती संकलित करून ती रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात द्यावयाची आहे. नेपाळी नागरिकांची व्यक्तिशः भेट घेऊन त्यांची पोलिसपाटलांनी चौकशी करावी तसेच अशा सूचना पत्राद्वारे दिल्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी सांगितले.
ऑक्टोबरमध्ये होते आगमन – आंबा हंगाम सुरू झाला की, ३० ते ४० हजार नेपाळी मजुरीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात येतात. गेल्या काही महिन्यांमध्ये मच्छीमारी व्यवसायामध्येही त्यांना खलाशी म्हणून मागणी आहे. नोव्हेंबर महिन्यापासून आंबा हंगाम सुरू सुरू होतो. ऑक्टोबर महिन्यात नेपाळी कोकणात येण्यास सुरुवात करतात.

