भारतीय जनता पक्षाचे सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी एस. टी. कामगारांची रत्नागिरीत भेट घेऊन तुमचा लढा योग्य असून, जोपर्यंत ठाकरे सरकार झुकत नाही तोपर्यंत लढत राहायचं हा तुमचा हक्क आहे आणि तुमच्या या संघर्षात भारतीय जनता पक्ष कायम तुमच्या सोबत राहणार आहे हे सांगण्यासाठी आम्ही आपल्यासमोर आलो आहोत. न्यायालय, रस्त्यावर आंदोलनासाठी जिथे जिथे तुम्हाला न्याय हवा आहे, आमची साथ हवी आहे तिथे तिथे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा खंबीर पाठिंबा जाहीर केला आहे.
निलेश राणे कामगारांना संबोधित करून पुढे म्हणाले कि, तुमचा हा संघर्ष फार पूर्वीपासून सुरु व्हायला हवा होता, अनेक वर्ष तुम्ही नेमाने आणि कष्टाने काम करत आहात. अनेक वर्षापासून तुमच्या या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. तुम्ही कायमच मागण्या मान्य होण्यासाठी लढतच आहात, परंतु यावेळी संपूर्ण महाराष्ट्राने एकत्रित आल्याने हे आंदोलन पेटले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर एसटी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय उन्हा तान्हामधे तासंतास बसले आहेत. कारण त्यांना विद्यमान सरकारकडून कोणताही आशेचा किरण दिसत असल्याने, यासाठीच तुम्ही ही एवढी टोकाची भूमिका घेतली आहे.
एसटी कामगार त्यांच्या हक्काचा पगार आणि विलीनीकरण मागत आहेत, गेले तीन दिवस ज्या ज्या ग्रामीण भागात एसटी गेली नाही त्या सर्वसामान्य जनतेला तुमची गरज लक्षात आली आहे. पण ठाकरे सरकारला अजून जाग आलेली नाही. अशावेळी हे ठाकरे सरकार तुमच्या मागण्यांचा विचार करण्याऐवजी मात्र तुम्हालाच कोर्टाचा आधार घेऊन एक प्रकारे घाबरवलं जात आहे. मात्र अस जर कोणी तुमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करत असेल तर भारतीय जनता पक्ष हे कदापि घडू देणार नाही. आमच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर येण्याची हिम्मत कोणी करायची नाही, असं झालं तर त्यांच्या पुढे आम्ही उभे राहू अशी ठाम ग्वाही निलेश राणे यांनी दिली.