राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरत चालला आहे. तरीही इंडियन मेडिकल असोसिएशनने संभाव्य तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये विविध जिल्हा आणि तालुक्यांमध्ये रुग्णवाढीचा दर कमी होत आहे. परंतु, सध्या कोरोनाचा धोका पाहता राज्यात कोरोना रोखण्यासाठीच्या नियमांमध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
व्यापारी आणि प्रवाशांच्या पदरी या निर्णयामुळे निराशा पडली आहे. कोरोनामुळे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दिलेल्या सोयी सुविधांपलीकडे दुकानं आणि प्रवासाच्या नियमात अन्य कोणतेही बदल नसतील, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनापासून स्वत:चे आणि कुटुंबियांचे संरक्षण करण्यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्यावर आमचा लक्ष असल्याचंही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बाधित रुग्णसंख्या आहे. तर उर्वरित २६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या प्रमाण कमी असल्याचं त्यांनी सांगितले.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि नगरमध्ये रुग्णसंख्या सतत वाढत असल्याची दिसत आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारला तिसऱ्या लाटेचा इशारा मिळाल्याने, सरकार सावधगिरी बाळगत आहे. इतर राज्यातून येणाऱ्या लोकांसाठी आरटीपीसीआरचाचणी ऐवजी, लसीकरणाचे दोन्ही डोस झाल्याचे प्रमाणपत्र पुरेसे ठरणार असल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्यात एक हजार डॉक्टरांची भारती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या सर्वच राज्यातून कोरोनामुक्त होण्यासाठी कसोसीने प्रयत्न सुरु आहेत, पण सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.