मच्छिमारांच्या पाठी लागलेले संकट काही पाठ सोडताना दिसत नाही. निसर्गाच्या कोपामुळे गेले महिनाभर जिल्ह्यातील मच्छीमारांना मासळीच मिळेनाशी झाली आहे. प्रथम पौर्णिमाच्या चांदण्यामुळे मासळी स्थलांतरित झाल्याने ती मिळत नव्हती. आता समुद्रात वारा असल्याने मच्छीमार नौका समुद्रात जाण्यासही धेजावत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मच्छीमार तर आर्थिक अडचणींमुळे मेटाकुटीला आला आहे. याचा परिणाम म्हणून रविवारी मासळीचे दर चढे असल्याने मच्छीमार्केटमध्ये खवय्यांची वानवा होती. जानेवारीच्या ३ तारखेला पौर्णिमा होती. पौर्णिमेच्या अगोदरचे आणि नंतरचे काही दिवस मासळी स्थलांतरीत होते. दरवर्षीचा हा अनुभव आहे. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच मच्छीमार नौकांना मासळी खर्चाइतकीही मिळतं नव्हती. पौर्णिमेचा मासे न मिळण्याचा परिणाम ओसरत असतानाच समुद्रात जोरदार वारे सुरु झाले. समुद्रात नौकांची मासे पकडण्याची जाळी वाऱ्यांमुळे गुरफटून तुटू लागली.
आधीच मासे कमी प्रमाणात मिळत असताना नादुरुस्त होणाऱ्या जाळ्यांचा खर्च अंगावर पडू लागला. त्यामुळे अर्ध्यावर मासेमारी सोडून नौका पुन्हा बंदरात परतण्याचे प्रमाण वाढले. नौकांचे इंधन, नौकेवरील खलाशी व इतर कामगारांचे रेशन, बर्फ असा विविध खर्च करूनही तो वसूल होण्याइतकीही मासळी मिळत नाही, अशी अवस्था आहे. जी काही मासळी मिळत आहे ती महाग दराने विकाबी लागत आहे. हे दर परवडत नसल्याने प्रमुख मच्छीमार्केटमध्ये ग्राहकांचा शुकशुकाट होता. पापलेटचे दर्शन तर दुर्लभ झाले आहे. मोठा सरंगा ६५०. ते ७०० रु. किलो दराने बंदरावरून खरेदी करावी लागल्याचे मच्छीमार महिला सांगतात. सुरमईचा दर ८०० ते ९०० रुपये, सौंदाळे ३०० ते ३५० दराने मिळत होते. बांगड्याचा किलोचा दर २०० रु. किलो होता. व्हाईट कोळंबी ५०० ते ६०० रु. ‘किलो दराने विकली जात होती.

