मुंबई-गोवा महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी प्रशासनाने पाऊस कमी झाल्यावर खड्डे भरण्यास सुरवात केली आहे, तसेच अपघातग्रस्त ठिकाणी सूचनाफलक, विविध चिन्ह आणि पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. अजूनही अनेक ठिकाणी चौपदरीकरणाचे काम अपूर्ण आहे. तेथे अपघात होण्याची शक्यता अधिक असल्यामुळे महामार्गावरील प्रवास सुखरूप व्हावा, यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या उपाययोजना केल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.
काम पूर्ण झालेल्या ठिकाणी वाहनचालक वेगाने वाहने चालवतात. काम सुरू असलेल्या ठिकाणी अपघाताचा धोका आहे. महामार्गावर वाहनाचा वेग नकळत वाढतो आणि त्यानंतर वाहन सलग वेगाने चालवल्याने ‘रोड हिप्नॉसिस’चा म्हणजेच संमोहित झाल्यासारखा अनुभव येतो. त्यामुळेच घात होऊन वाहनांचा अपघात होतो. त्यामुळे संमोहित झालेल्या मनाला पुन्हा ध्यानावर आणण्यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी झेंडे तसेच बोर्ड लावण्याचा उतारा राष्ट्रीय महामार्ग विभागाने शोधला आहे. त्यामुळे चालक संमोहित होणार नाही.
मेंदू व मानसतज्ज्ञांच्या मते कुठल्याही प्रवासात अथवा कृतीत एकसुरीपणा आला की, झोप येण्याची शक्यता बळावते. महामार्गावर शारीरिक व मानसिक थकवा वाढून चालकांना डुलकी लागू शकते शिवाय दृश्यमानतेतही बदल होणार नसल्याच्या परिस्थितीने चालकांमधील सतर्कता कमी होते. झेंड्यांकडे पाहिल्यानंतर एकप्रकारे काहीतरी हलते आहे, या विचाराने मेंदू सतर्क राहतो. मार्गात आडवे काही येणार असेल किंवा रहदारी अधिक असेल तर मेंदू त्याची सतर्कता अधिक ठेवत असतो.