मच्छीमारांनी बोटींमध्ये वापरलेले इंजिन ऑइल खरेदी करून त्याद्वारे सागरी प्रदूषणावर रोख बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुण्यातील ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅण्ड इकॉनॉमिक्स’च्या (जीआयपीई) ‘सेंटर फॉर सस्टेनेबल डव्हल्पमेंट’ने हा उपक्रम राबविण्याला आहे. त्यासाठी “ओशन ऑईल कलेक्शन एन्व्हार्यमेंटल अॅक्शन नेटवर्क” (ओशन) हा प्रकल्प राबवला जात आहे. यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११ मच्छीमारी बंदरे निवडली असून, तिथे नौकांमधील इंजिन ऑईल मच्छीमारांकडून गोळा केले जाणार आहे. सध्या ३ बंदरावर दोन महिन्यात ५०० लिटर तेल गोळा झाले आहे. ‘आसंमत बेनोव्हलन्स फाउंडेशन’च्या पुढाकाराने रत्नागिरीत झालेल्या तीनदिवसीय सागर महोत्सवावेळी ओशन प्रकल्पाविषयी सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या पूजा साठ्ये यांनी माहिती दिली.
जीआयपीई आणि एस. एल. किर्लोस्कर फाउंडेशनद्वारे ओशन हा प्रकल्प राबवला जात आहे. मच्छीमार हे बोटीमध्ये लुब किंवा इंजिन ऑइल टाकतात. विहित कालावधीनंतर हे इंजिन ऑइल बदलावे लागते. वापरलेले इंजिन ऑइल म्हणजेच वंगण तेल बहुतांश मच्छीमार समुद्रात फेकतात. त्यामुळे सागरी प्रदूषण वाढते. ‘ओशन’ प्रकल्पासाठी २०२३ साली सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये काही मच्छीमारांबरोबर संवाद साधण्यात आला. एका मोठ्या जहाजामध्ये १५ लिटर ऑईल भरले जाते. त्यापैकी १० लिटर जळके ऑईलही म्हणतात तर छोट्या बोटींमध्ये ७.५ लिटर इंजिन ऑईल भरल्यानंतर त्यातून ६.७ लिटर वंगण तेल उरते. महाराष्ट्रात सुमारे १९ हजार तर रत्नागिरी जिल्ह्यात साडेपाच हजार नोंदणीकृत नौका आहेत. त्यामधून सुमारे सहा लाख लिटर वंगण तेल समुद्रात टाकले जात असल्याचा अंदाज आहे.
या समस्येवर उपाय म्हणून “ओशन” प्रकल्पांतर्गत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११ बंदरांवरील मच्छीमारांकडून वंगण तेल हे वीस ते तीस रुपये प्रतिलिटर दराने विकत घेतले जाते. ते तेल पुण्यातील एका कंपनीला विकण्यात येते. त्यामुळे मच्छीमारांना रोजगारही मिळत आहे तसेच समुद्रात जाणाऱ्या तेलाचा पुनर्वापरही होत आहे. हा प्रकल्प प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांच्या अधीन राहून सुरू आहे. वंगण तेलाचा पुनर्वापर करून तयार झालेले तेल हे बॉयलर इंधन आणि इतर लुब्रिकेशनसाठी वापरण्यात येणार आहे.