मुंबई -गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव व रत्नागिरी जिल्ह्यातील हातीवले या दोन्ही टोलनाक्यावर टोलवसुली करण्याचे आदेश संबंधितांना मिळाले आहेत. पोलीस संरक्षणात टोलवसुली करण्याचे निर्देश महामार्ग प्राधिकरणचे कोल्हापूर येथील डिजीएम तथा प्रोजेक्ट डायरेक्टर व्ही. डी. पंदरकर यांनी टोल ठेकेदार करीमुन्नीसा कंपनीला दिले आहेत.
सिंधुदुर्ग पासिंगच्या वाहनांना टोलमुक्ती मिळावी, अशी मागणी सर्वपक्षीय, नागरिकांची असताना हा आदेश देण्यामागे नेमके कोण आहे? असा प्रश्न नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे. खासदार विनायक राऊत,व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोक प्रतिनिधी यासह सर्वपक्षीय पदाधिकारी आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ओसरगाव टोलनाक्यावरील टोलवसुली चाचणीला सर्वच पक्षीयांनी कडाडून विरोध दर्शवला होता. परंतु तरीही शिंदे गटाचे सरकार आल्यानंतर हा आदेश त्वरित निघाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या टोल वसुलीला मनसे, शिवसेना, भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने देखील विरोध दर्शवला होता.
राज्यामध्ये सत्ता बदल घडून आल्यावर, पोलीस संरक्षणामध्ये रखडलेल्या टोलवसुलीचेचे आदेश निघाले आहेत. त्यानुसार, महामार्ग प्राधिकरणाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी २९ जून, २०२२ रोजी पोलीस बंदोबस्तात टोलवसुली सुरळीत होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे, असा लेखी आदेश काढला आहे. आता प्रत्यक्षामध्ये पोलीस बंदोबस्तात ओसरगाव आणि रत्नागिरीतील हातीवले टोलनाक्यावर टोलवसुलीचे आदेश निघाल्याने जनतेच्या माथी टोळधाड पडणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजगी दिसून येत आहे. आणि असा आदेश निघाण्यामागे नक्की कोणाचा “वरदहस्त” आहे त्याबाबत चर्चा सुरु आहे.